लढाई जिंकली... पुढे?

Posted by Abhijit at 10:05 PM

Sunday, November 30, 2008

ही लढाई म्हणजे आधी शरीर पोखरत असलेल्या रोगानं वर काढलेलं डोकं होतं. त्यानं डोकं वर काढल्यानंतर आय.सी.यू.मध्ये तीन दिवस औषधोपचार झाले आणि वर आलेलं डोकं छाटून टाकण्यात आलं. याचा अर्थ रोगी बरा झालेला नाही. मुळात हा रोग का झाला आणि यापुढे किती दिवस काळजी घ्यावी लागणार आहे, हे महत्त्वाचं. आता रोग दिसत नाही, म्हणून जल्लोष करण्यात अर्थ नाही. घरी आलेल्या रोग्याची नीट काळजी घेणं सगळ्यात आवश्‍यक असतं.

अभिजित थिटे

शनिवारी आपण लढाई जिंकली. आधीचे तीन दिवस टांगणीला लागलेला जीव सुखावला. ताज हॉटेलमधला शेवटचा अतिरेकी मारला गेला आणि आपण साऱ्यांनीच सुस्कारा सोडला. शनिवार सकाळपासून तणावलेलं वातावरण निवळलं. आपण सारेच मोकळे झालो... सिनेमाला जायला, गप्पा मारायला, मुक्तपणे फिरायला आणि अर्थातच राज्यकर्त्यांवर टीका करायला.
शनिवारी कशाला, शुक्रवारी रात्री टीव्हीवर नरिमन हाउस, ओबेरॉय हॉटेलची जी दृष्यं दाखवली जात होती, त्यावरून आपण तेव्हापासूनच जल्लोषी झाल्याचं दिसत होतंच की!
मुक्‍तपणे साजऱ्या करायच्या सुटीचे वेध शुक्रवारी लागले. शनिवारी सकाळी टीव्हीला चिकटलेले सगळे शेवटचा अतिरेकी मारला गेल्याच्या बातमीने मोकळे झाले आणि सुरू झाला जल्लोष...
हो जल्लोषच... अगदी रस्त्यावर उतरून गाणं-बजावणं नसेल; पण मनावरचा ताण हलका झालाच ना... आपण नेहमीच्या कार्यक्रमांना, विकएंडचे कार्यक्रम आखायला मोकळे झालो ना...
या दोन दिवसात, म्हणजे शनिवार आणि रविवारमध्ये या प्रकरणात दोषी कोण ही चर्चा अगदी जोमानं सुरू झाली. शिवराज पाटील, आर.आर. आबा, विलासराव, मनमोहनसिंग अगदी सगळ्या राज्यकर्त्यांवर आगपाखड करून झाली. कोणी हाच धागा भाजप सरकार ते थेट नेहरू आणि गांधीजींपर्यंतही नेला. यात सारेजण एक महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा गुन्हेगार विसरून गेले. विसरून गेले म्हणण्यापेक्षा हा गुन्हेगार आहे, हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. तो गुन्हेगार आहे, आपण सारे...
खोटं वाटतंय? पटत नाहीये? या घटनेची जबाबदारी आपल्यावरच कशी? लिहिणाऱ्याला वेड लागलंय... अशा काहीशा भावना उमटतील मनामध्ये; पण नीट विचार केला, आपणच केलेल्या विधानांची संगती लावली, तर सहजपणे लक्षात येईल, की हे खरं आहे. आपण एक एक मुद्दा विचारात घेऊ...
पहिला अगदी महत्त्वाचा मुद्दा राज्यकर्त्यांचा. आपले राज्यकर्ते नेभळट आहेत. ते कडक कारवाई करत नाहीत. त्यांना त्यांची "व्होट बॅंक' सुरक्षित ठेवायची आहे. मुद्दे चुकीचे आहेत का? तसं म्हणता येणार नाही; पण आपले राज्यकर्ते असे कसे, याचा आपण कधी विचार केला आहे का?
पटकन कोणावर तरी कारवाई करावी. चुकीचं वागणाऱ्याला अटकाव करावा, गुन्हेगाराला शासन करावं, एवढं स्वातंत्र्य आपणच दिलंय का त्यांना?
आपण येताजाता किती नियम तोडतो, याचा आपणच विचार केलाय का कधी? आपण केलेली बेकायदा बांधकामं आपल्या डोळ्यावर आलीत कधी? ती तोडायला येणाऱ्यांवर दगडफेक आपणच करत असतो ना? आपण जेव्हा घर घेतो, तेव्हा आपला बिल्डर मनपामध्ये इमारतीचा नकाशा "पास' करून घेण्यासाठी पाठवतो. त्यामध्ये इमारतीतील सगळ्या सदनिकांचे नकाशे असतात. कोणती खोली कुठे असेल, भिंती कोठे आहेत, प्रत्येक खोली किती चौरस फुटांची आहे, बाल्कनी आहे का, टेरेस आहे का, या सर्वांची नोंद त्या नकाशावर असते. याचाच अर्थ त्यानंतर आपण घरात जे काही बदल करू, ते मनपाच्या परवानगीने केले पाहिजेत, त्याची नोंद मनपामध्ये असली पाहिजे.
आपण आपल्या घरात अंतर्गत सजावट केली, बाल्कनी आत घेतली, खिडकी मोठी केली... किंवा इतर काही छोटे मोठे बदल नक्की केले असतील. या प्रत्येक बदलासाठी किती जणांनी मनपाची परवानगी घेतली? किती जणांनी नकाशे सादर केले? ही चूक नाहीये का? हा गुन्हा नाहीये का? परवा त्या अतिरेक्‍यांना ताज हॉटेलची खडान्‌खडा माहिती होती. आपल्या लष्कराला ती नव्हती. त्यांनी हॉटेलचा नकाशा मागितला, तर तो मनपामध्ये नव्हता. समजा असता, तर आतील सारी परिस्थिती नकाशामध्ये दाखविल्यासारखीच असती? आपण अशी खात्री देऊ शकतो?
आपल्या रस्त्यांवर कोट्यवधी गाड्या फिरतात. त्या चालविणारे तुमच्याआमच्यासारखे कोट्यवधी नागरिक आहेत. किती जणांकडे गाड्या चालविण्याचे परवाने, गाड्यांची, गाडी रस्त्यावर आणण्यासाठी आवश्‍यक असणारी आवश्‍यक कागदपत्रे आहेत? मी इथं प्रमाणाविषयी बोलतोय. तुमच्या-माझ्याकडे लायसन्स आहे, इथं मुद्दा प्रमाणाचा आहे. पोलिसांना विचारलं, तर ते प्रमाण सांगतात. गाडी चालविण्याचे नियम आपण पाळतो? पोलिस असल्यानंतर सिग्नल व्यवस्थित का पाळले जातात? पोलिस नसताना सिग्नल चुकविण्यावर का भर असतो? गोष्टी अगदी साध्या आहेत. गाड्या किंवा इमारत, घर या गोष्टी उदाहरणासाठी घेतल्या आहेत. आपण सारे व्यवस्थित नियम पाळणारे असू, तर नियम तोडणारा सहजपणे लक्षात येईल ना?
व्होटबॅंकेचा मुद्दा सगळ्यात जास्त चर्चिला गेला. पण मुद्दा असा आहे, की या व्होट बॅंका तयार का होतात? जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या अस्मितांवर मते का मागितली जातात आणि तशी मागितल्यानंतर तो उमेदवार निवडून का येतो? मतदान किंवा आपली लोकशाही ही अस्मितांवर चालते का? आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे असते का? आपल्या देशात सार्वजनिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्‍न आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये या विषयावर एक परिषदही झाली. बहुसंख्य खेड्यांमध्ये आजही संडास नाहीत. या प्रश्‍नावर एकही निवडणूक का लढली गेली नाही? शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक, रस्ते, गाड्यांची संख्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या प्रश्‍नांमुळे आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मग हा महत्त्वाचा मुद्दा सोडून एखाद्या अस्मितेला हात का घातला जातो? आपण मत मागायला येणाऱ्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना जाब का विचारत नाही? त्यांना एखाद्या निवडणुकीत धडा का शिकवत नाही?
याचं कारण आपण मुळी मतदानालाच जात नाही. विचारी समाज मतदानापासून दूर राहणार असेल, तर या गोष्टी घडणारच. आपल्या देशाच्या सुदैवानं आणि मतदानाची आकडेवारी पाहता हा विचारी समाज बहुसंख्य आहेत. (त्यामुळे मतदानाची आकडेवारी नेहमी कमी असते...) या बहुसंख्यांनी असे प्रश्‍न विचारायला सुरवात केली आणि त्यानुसार मत द्यायला सुरवात केली, की राजकीय नेतृत्वाला विचार करावाच लागेल ना...
असे मुद्दे भरपूर आहेत. ताजमधील अतिरेक्‍यांपैकी दोघेजण तिथेच इंटर्नशिप करत होते म्हणे. याचाच अर्थ आधी ते कोणत्यातरी कॉलेजमध्ये शिकत होते. शिकताना कुठेतरी घर भाड्याने घेऊन राहात होते.
कॉलेजात ऍडमिशन कशा प्रकारे मिळू शकते, हे आपल्याला नवं नाही. घर भाड्याने घेतल्यानंतर आपण किती चौकशी करतो, हे आपल्यालाच चांगलं माहीत आहे. आपण सुरक्षितता पाहतो की भाडं, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
एक चांगलं उदाहरण देतो. मी काही वर्षं गोव्यात होतो. तिथे ज्यांच्याकडे भाड्यानं राहात होतो, त्यांनी माझ्याकडून सुरवातीलाच एक फॉर्म भरून घेतला. तो फॉर्म पोलिसांनी दिला होता. त्यात माझी संपूर्ण माहिती, मी मुळचा कुठला ही माहिती, मूळच्या घराचा पत्ता, फोन, माझ्या मूळच्या घरात, म्हणजे पुण्यात आणखी कोण कोण राहतात, ते कुठे काम करतात, तिथले क्रमांक कोणते वगैरे साऱ्या गोष्टी त्यांनी नोंदून घेतल्या. नंतर मला पोलिस चौकीमध्ये जाऊन पोलिसांसमोर सह्या कराव्या लागल्या. पोलिसांनी मी नोकरी करत असलेल्या ठिकाणी आणि पुण्यामध्ये फोन करून, त्यांच्या पद्धतीनं चौकशी करून मी लिहून दिलेल्या गोष्टी खऱ्या असल्याची खात्री करून घेतली... हे असं इतर शहरांमध्ये का घडत नाही? मला गोव्याची पद्धत आवडली. मी तसं पोलिसांना सांगितलं, गोवा सोडताना त्यांना तसं पत्रही पाठवलं... आपण किमान एवढी चौकशी केली, पोलिसांना सहकार्य केलं, तर बरेच प्रश्‍न सुटतील, असं वाटत नाही का?
राहता राहिला मुद्दा सुरक्षिततेचा. हे अतिरेकी एकदम कसे घुसले हा... तर यात गुप्तहेर यंत्रणांचं अपयश आहे, हे मान्यच करायला हवं. तरीदेखील एक बोट आपल्याकडे वळतंच. साधं उदाहरण घेऊ. आपल्या इमारतीत किंवा कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी कडक पावलं उचलली. आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्यांची तपासणी करणं, नोंदी करणं सुरू केलं तर? माझ्या इमारतीत, घरात जाताना सिक्‍युरिटीनं माझी पिशवी, सॅक तपासायला सुरवात केली, तर मला चालेल? त्यात मी बिल्डिंगचा सेक्रेटरी असेल तर?
जे तुम्हाला-मला चालत नाही, ते आपल्या आमदार-खासदारांना, मोठ्या अधिकाऱ्यांना चालेल?
मुद्दा फिरून फिरून तिथंच येतो. आपण अमेरिका, इंग्लंड, इस्राईलचं उदाहरण वारंवार देतो. तिथं कशी कडक सिक्‍युरिटी आहे, याचे गोडवे गातो. फक्त हे गात असताना तिथल्या नागरिकांविषयी विचार करायला विसरतो. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेनं हे युद्ध आहे, असं घोषित केलं. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी प्रशासनाला प्रचंड सहकार्य केलं. तिथला मीडियाही जबाबदारीनं वागला. तिथल्या हल्ल्यांची, त्यानंतर होणाऱ्या कारवाईची दृष्यं टीव्ही सिरिअलसारखी दाखविली गेली नाहीत. जे दाखविणं आवश्‍यक आहे तेवढंच, आणि जे सुरक्षिततेच्या दृष्टीनं, कारवाईच्या दृष्टीनं घातक आहे, ते दाखविणं कटाक्षानं टाळलं गेलं. मागे गोळीबार होत असताना तिथले नागरिक "मज्जा' बघण्यासाठी गर्दी करत नाहीत. टीव्हीच्या कॅमेरासमोर घुटमळून हात हलवत नाहीत...
आपण तिथल्या स्वच्छतेचं कौतुक करतो, तेव्हा ती स्वच्छता सामान्य नागरिकच राखत असतात, हे का विसरतो?
मुद्दा हाच आहे. आपण नागरिक शास्त्र शिकतो, आचरणात आणत नाही. त्यामुळेच घटना घडून गेली, की राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. निवडणून न येणारी, निवडणुकीत पडणारी मंडळी देशाची महत्त्वाची मंत्रिपदं भूषवू शकतात. एकही निवडणूक सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य अथवा वाहतूक या प्रश्‍नावर लढविली जात नाही. स्वस्त तांदूळ, गहू, टीव्ही अशा भूलथापांना आपण बळी पडतो....
थोडक्‍यात आत्ता रोगानं वर काढलेलं डोकं छाटलं गेलंय. खरी काळजी रुग्ण घरी आल्यानंतर घ्यायची असते. ती आपण घ्यायला हवी. सुजाण नागरिक हे फक्त नागरिक शास्त्रातील पुस्तकात नसतात. ते प्रत्यक्षातही असावे लागतात. आपण आत्तातरी नसे नाही, म्हणून आपली लोकशाही साठ वर्षांची झाली, तरही "मॅच्युअर' होऊ शकलेली नाही. मुंबईची घटना हा आपण वर्षानुवर्षे करत असलेल्या दुर्लक्षाचा परिपाक आहे. आतातरी आपण विचार करूया, पावलं उचलूया... आपल्या पुढच्या पिढीसाठीतरी हे करायलाच हवं...

काय चाललंय काय हे?

Posted by Abhijit at 9:56 PM

Wednesday, November 26, 2008

काल रात्रीपासून डोळ्याला डोळा नाही. मुंबईत जे काही सुरू आहे, त्याला युद्धच म्हटलं पाहिजे... कशासाठी हे सारं? काय साध्य होणार आहे यातून? अतिरेक्‍यांनी काही जणांना डांबून ठेवलंय. कदाचित ते काही मागण्या पुढे करतील. त्या पूर्ण केल्या जातील किंवा आता विचार न करता अतिरेक्‍यांना मारण्यात येईल... पुढे?
पुढे काय, हेच समजत नाहीये... टीव्हीवर काही फोटो दाखवत होते. कोवळी पोरं आहेत ती सगळी... पोलिस अधिकारी अशोक कामटेंचा चेहरा तर सारखा समोर येतोय... आणि एटीएसचे करकरे...
का? कशासाठी हे सारं?
ही पोरं तरी स्वत:च्या जीवावर उदार होऊन हे काय करताहेत? बरं कुठेही घुसून निष्पापांवर गोळ्या झाडून त्यांना तरी काय मिळणार आहे? मुक्ती? हा वेडाचार नाही का?
आधी कोणाच्यातरी आई, वडिल, बहिण, भाऊ, नवरा, बायको, आजी, आजोबा... असं कोणालातरी मारून मुक्ती मिळेल?
कोणाचा लढा आहे हा आणि कोणासाठी?
आपल्याला वाटणारा, जाणवणारा वेडाचार या पोरांच्या अंगी कसा काय भिनलाय? त्यांच्या अंगी हे भिनवणारे कोण आहेत? मुंबईतला हा प्रश्‍न सुटेल अजून काही तासांनी; पण या फक्त फांद्या आहेत... मुळांचं काय?
ज्ञानेश्‍वर माऊलींनी विश्‍वात्मक देवाकडे "दुरीतांचे तिमीर जावो, तया सत्कर्मी रती वाढो...' असं पसायदान मागितलं... काय झालं त्याचं? दोन्ही बाजूनी फक्त माणसं मरत चालली आहेत... मनं मात्र तशीच दुष्ट, क्रूर आणि निगरगट्ट राहिली आहेत...
बरं ज्याच्या नावाखाली... ज्या परमेश्‍वराच्या नावाखाली हे जे काही सुरू आहे, त्याला त्याची तरी मान्यता असेल का?
काल रात्रीपासून नुसते प्रश्‍नच घोघावताहेत डोक्‍यात... मुंबईत हकनाक बळी पडलेले ऐंशी नागरिक, ओळखीचे, माहिती झालेले आणि लढता लढता शहीद झालेले पोलिस अधिकारी आणि ती कोवळी पोरं... सगळेच डोक्‍यात फिरताहेत...
मीच काय, आपण सारेच सुन्न झालोय...
प्रश्‍न फक्त सीमेवरचा किंवा काही शहरातला नाही... हा प्रश्‍न तुमच्या-आमच्या मनांचा असेल का? आतातरी कठोर पावलं उचलायला हवीत, असं सगळ्यांनाच वाटतंय... पण तेवढंच पुरेसं आहे?
"1947 अर्थ' सिनेमात एक गाणं आहे...

ईश्‍वर अल्ला तेरे जहॉं में
नफरत क्‍यूँ है? दर्द है क्‍यूँ?
तेरा दिल तो इतना बडा है
इन्सॉं का दिल तंग है क्‍यूँ?

कदम कदम पर सरहद क्‍यूँ है?
सारी जमी जो तेरी है
सूरज के इतरे करती है
फिर क्‍यूँ इतनी अंधेरी है?
इस दुनिया के दामन पर
इन्सा के लहू का रंग है क्‍यूँ?

गुँज रही है कितनी चिखें
प्यार के माथे खून सुने
टूट रहें है कितने सपने
इनके टुकडे कौन चुने
दिलके दरवाजों पर ताले
तालों पर ये जंग है क्‍यूँ?

ईश्‍वर अल्ला तेरे जहॉं में
नफरत क्‍यूँ है? दर्द है क्‍यूँ?

माझं येऊ घातलेलं नवं पुस्तक...

Posted by Abhijit at 10:02 PM

Thursday, November 20, 2008


दुसरं महायुद्ध. हिटलरनं ज्यूंचं शिरकाण मांडलं होतं. पोलंडच्या राजधानीत, वॉर्सामधल्या घेटोत सुमारे चार लाख ज्यू कोंडले होते. टप्प्याटप्प्यानं त्यांना छळ छावण्यांत पाठवून ठार मारण्यात येत होतं. घेटोतल्या छळामुळे आणि टंचाईमुळे एका महिन्यात सरासरी 5 ते 6 हजार माणसं मरत होती. लहान मुलांचे, अनाथ मुलांचे हाल तर विचारू नये असे होते. ज्यूंबाबत कणव वाटणाऱ्याला, त्यांना मदत करणाऱ्याला नाझी अतिशय क्रूर शिक्षा देत होते. मदत करणारं कुटुंबच्या कुटुंबच छळाला बळी पडत होतं. सारीकडे अंधार दाटून आला असताना इरेना सेंडलर नावाची एक तरुणी पुढे सरसावली. वॉर्साच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या या तरुणीनं घेटोमध्ये शिरकाव करून घेतला आणि सुरू झालं एक महानाट्य! छळ, क्रूरता विरुद्ध सहृदयता असा हा सामना होता...

तेजशलाका

Posted by Abhijit at 4:45 AM

Friday, October 31, 2008

इरेना सेंडलर यांचं युद्धकाळातलं काम पाहूनच आपण "आकाशाएवढा...' असं म्हणू लागतो. त्यांच्याविषयी विचार करताना बुद्धी, मन- सारंच थिटं पडतं. कोणत्याही प्रकारच्या विचारांच्या चिमटीत त्या गवसेनाशा होतात. त्यांच्यावर कुठलंही "लेबल' चिकटवता येत नाही. पाहता पाहता त्या एवढ्या मोठ्या होतात, की फक्त त्या वेळचीच नाही, तर आतापर्यंतची सारी क्रूरता, सारा कोतेपणा यांना व्यापून शिल्लक राहतात. आपलं जग सुरळीतपणे चाललंय ते अशा माणसांच्या खांद्यावर.

इरेना सेंडलर. पोलंडमधील वॉर्सापासून साधारण पंधरा मैलांवरील ओटवाक गावात 15 फेब्रुवारी 1910 रोजी जन्म. वडील डॉक्‍टर. इरेना सात वर्षांची असताना एका साथीच्या रोगात त्यांचं निधन. दुसरं महायुद्ध. नाझींचा नंगानाच अनुभवलेल्या इरेना यांचं वॉर्सामध्ये 12 मे 2008 रोजी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झालं. काय विशेष आहे या माहितीत? कोण या इरेना? 97 वर्षं जगल्या हे महत्त्वाचं, की त्यांनी दुसरं महायुद्ध अनुभवलं, हे महत्त्वाचं? ऑस्कर शिंडलर आठवतोय? शिंडलर्स लिस्ट सिनेमा पाहिलाय? त्यावरचं पुस्तक वाचलंय? सिनेमा पाहिलेला नसला, पुस्तक वाचलेलं नसलं, तरी ज्यूंच्या वंशविच्छेदाविरोधात उभ्या राहिलेल्या, एक हजार ज्यूंचा जीव वाचविणाऱ्या शिंडलरला कधीतरी मनोमन सलाम केलेलाच असेल. नाझींच्या क्रूरतेमुळे अंगावर काटा उभा राहिला असेल. ज्यूंसाठी जीवही कळवळला असेल. इरेना सेंडलर आणि ऑस्कर शिंडलर यांच्यात आडनावाच्या उच्चारातील काहीशा साधर्म्याशिवाय काय साम्य आहे?

मोठं आणि महत्त्वाचं साम्य आहे. शिंडलर यांच्याप्रमाणे इरेना यांनीही त्याच काळात थोड्याथोडक्‍या नाही, तर 2,500 ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून सोडवलं. हा आकडा चुकीचा वाटेल कदाचित. सुरवातीला कोणाचीही हीच प्रतिक्रिया होते. इरेना यांना प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेतील इतिहास विषयाच्या चार विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिकेचीही हीच प्रतिक्रिया होती. 250 मुलं असावीत, असा त्यांचा अंदाज होता; पण इरेना हे व्यक्तिमत्त्व अशा साऱ्या अंदाजांना छेद देऊन, अनेक क्रिया-प्रतिक्रिया, अंदाज यांना मागे सारत इतकं उंच उभं राहतं, की भारावलेले आपण नतमस्तक होणंही क्षणभर विसरून जातो. इरेना एवढ्या मोठ्या होत्या, तर त्यांची माहिती कशी नाही? त्यांचं नावही कधी कानावर पडलेलं नाही. असं कसं?

इथेच इरेना आपल्या समजुतींना पहिला छेद देतात. तशी इस्राईलच्या याद वाशेम या संस्थेनं "राइट्‌स अमंग द नेशन्स' (सर्व देशांतील सर्वोत्तम) हा सर्वोच्च सन्मान देऊन 1965 मध्येच कृतज्ञता व्यक्त केली होती. पोलंड देशाचा सर्वोच्च सन्मान असणाऱ्या "व्हाइट ईगल'नंही त्या 2003 मध्येच सन्मानित झाल्या होत्या. त्याच वर्षी शांततेसाठीच्या नोबेल पारितोषिकासाठी पोलंड सरकारनं त्यांचं नामांकन केलं होतं. एवढं झालं, तरी त्यांची बाहेरच्या जगाला अजूनही फारशी माहिती नाही. पाश्‍चात्त्य राष्ट्रांना त्यांची थोडीफार ओळख 1999 नंतर होत गेली. अमेरिकेतील पिट्‌सबर्ग, कनास येथील एका शाळेतील काही मुलींना "इतिहास दिवसा'साठी एक नाटुकलं सादर करायचं होतं. कोणती व्यक्तिरेखा निवडू या, काय करू या, अशी चर्चा सुरू असताना, त्यांच्या शिक्षिका नॉम कॉनार्ड यांच्या हाती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमी लागली. ती बातमी होती इरेना सेंडलर यांच्याविषयी. "द अदर शिंडलर्स' या नावानं ही बातमी होती. त्यात इरेना यांच्यावर एक परिच्छेद होता. त्यामध्ये त्यांनी वॉर्सा घेटोमधून 2,500 मुलांना वाचविलं, असा उल्लेख होता. या मंडळींनी आणखी संशोधन करायचं ठरवलं. एक तर ती बातमी 1994 मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे पोलंडमध्ये माहितीविषयी चाचपणी सुरू झाली. त्यांचं थडगं कुठे आहे, अशीही विचारणा करून झाली. मिळालेली माहिती उत्साह वाढविणारी आणि तेवढीच आश्‍चर्यकारक होती. इरेना सेंडलर अजूनही हयात आहेत. त्या पोलंडमध्येच, अगदी वॉर्सामध्येच राहतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2,500 हा आकडा अगदी बरोबर आहे. या मुलींचा आनंद गगनात मावेना. त्यांनी इरेना यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांच्याकडून माहिती मिळवली. अर्थात मिळालेली माहिती खूप कमी असली, तरी 10 मिनिटांच्या नाटिकेसाठी पुरेशी होती. स्वतःविषयी, स्वतःच्या कर्तृत्वाविषयी बोलायला इरेना स्वतःच नाखूष होत्या, ही धक्कादायकच बाब होती.

आपण केलेल्या या मोठ्या कामाची माहिती इरेना यांनी कधीच कोणालाही सांगितली नाही. "राइट्‌स अमंग द नेशन्स' आणि व्हाइट ईगल असे मानाचे पुरस्कार मिळूनही त्या जगासाठी अनोळखी होत्या, याचं कारण हेच आहे. पण ही ओळख झाली पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानं जगाला विनाश, क्रूरता, वंशविच्छेद, विध्वंस यासारख्या मानवी मनाच्या काळ्या बाजू दाखविल्या. माणूस किती पातळीपर्यंत हीन होऊ शकतो, तो किती क्रूर असू शकतो, याची उदाहरणं दिली. पण त्याच महायुद्धानं ऑस्कर शिंडलर, इरेना सेंडलर, फ्रान्समध्ये असणाऱ्या बुद्धिमंत आणि कलाकार ज्यूंना वाचविणारी मेरी जेन गोल्ड ही अमेरिकन महिला, हंगेरीतील जॉर्जिओ पेर्लास्का अशी माणसंही दिली. नाझींच्या ताब्यात जाऊनही आपल्या देशातील ज्यूंना छळछावणीत पाठवू न देणारं, त्यांना संरक्षण देण्यासाठी धडपडणारं, अगदीच अवघड परिस्थिती निर्माण झाल्यावर साऱ्या ज्यूंना पळून जाण्यास मदत करणारं आणि युद्ध संपल्यावर त्यांचं आनंदानं स्वागत करणारं डेन्मार्कसारखं राष्ट्रही याच युद्धात जगानं पाहिलं. होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद हा मानवी इतिहासातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्‍य. महायुद्ध संपून आज सत्तर वर्षं होत आली, तरी या जखमा काही भरत नाहीत. भरणं शक्‍यही नाही. ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकीही असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो, तो हाच असतो.

घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणाऱ्यांत काही स्त्रियाही होत्या, लहान लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणाऱ्यांतही काही स्त्रिया होत्या, आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडविणारी, मायेची पखरण करणारी इरेना नावाची एक आईही होती. मारणाऱ्यापेक्षा वाचविणारा नेहमीच श्रेष्ठ असतो, हे वाक्‍य आपण साऱ्यांनीच कधी ना कधी, कुठे ना कुठे वाचलेलं, ऐकलेलं असतं. त्याची यथार्थता इरेना यांच्या कहाणीत दिसते. इरेना यांचा विचार करायचा तो यासाठीही.

"अणुरेणुया थोकडा, तुका आभाळाएवढा,' संत तुकाराम महाराजांचं हे वचन या साऱ्या कालावधीत ठसठशीतपणे सामोरं येतं. मानवी मनाच्या या दोन अवस्था या कालावधीचा विचार करताना प्रकर्षानं जाणवतात. स्वतःच्या मुलाबाळांची, घरातील वडीलधाऱ्यांची अगदी मनापासून काळजी घेणारा एक माणूस दुसऱ्याबाबत कल्पनातीत क्रूर होऊ शकतो, हे इथंच तर दिसतं. आपल्या बाळाला साधा ठसका लागला, तर धावाधाव करणारा एक डॉक्‍टरी पेशाचा माणूस केवळ ज्यू आहेत, या कारणासाठी लहान लहान मुलांवर विविध प्रयोग करतो, त्यांचा "गिनिपिग' म्हणून वापर करतो, तोही कोणत्याही प्रकारची भूलही न देता, या क्रूरतेला काय म्हणावं? घरातील ज्येष्ठांचा आदरसत्कार करणारा एखादा अधिकारी केवळ धर्म ज्यू आहे म्हणून एखाद्या आजोबांची दाढी हिसडून काढतो. वेदनेनं कळवळले, या "गुन्ह्या'ची शिक्षा म्हणून बेदम मारहाण करतो. मजा म्हणून संगिनीच्या धाकानं एका आजीबाईंना भर रस्त्यात नाचायला लावलं जातं. आपल्या बाळाला फुलासारखं जपणारा एक सैनिक एका आईकडून तिचं बाळ हिसकावून घेतो, उंच उडवतो आणि दुसरा सैनिक त्या उडवलेल्या बाळावर गोळी झाडतो आणि या नेमबाजीचं बाकीचे कौतुक करतात, या साऱ्याची संगती लावायची तरी कशी? अणूपेक्षा लहान, कोतं आणि क्रूर मन वेगळं काय असणार?

हे सारं पाहून दुसरी एक स्त्री कळवळते. तिचं कळवळणं घरापुरतंच मर्यादित राहत नाही. काहीतरी केलं पाहिजे, कोणीतरी पुढं झालं पाहिजे, अशी फक्त दिवाणखान्यापुरती चर्चा राहत नाही. ती स्वतः पुढं होते. वॉर्सामधील ज्यूंसाठी गुप्तपणे काम करणाऱ्या एका संघटनेसाठी काम करू लागते. लहान लहान मुलांना त्या घेटोतून बाहेर काढण्याचं, त्यांचा जीव वाचविण्याचं स्वप्न पाहते; ते प्रत्यक्षातही आणते. काम करताना पकडली जाते. प्रचंड शारीरिक आणि मानसिक वेदना सोसते. आपण बोललो तर आतापर्यंत वाचविलेली मुलं आणि त्यांना आश्रय देणाऱ्या शेकडो, हजारो पोलिश कुटुंबांवर नाझी अत्याचारांचा नांगर फिरेल, याची तिला जाणीव असते. हजारोंचा जीव, का एक जीव... तिच्यासमोर अगदी साधा, सरळ प्रश्‍न असतो. ती त्या एका जिवाची निवड करते. तो जीव तिचा स्वतःचा असतो, तरीही! इतका छळ सोसूनही ती तोंड उघडत नाही, हे पाहून संतापलेले नाझी तिला मृत्युदंड फर्मावतात. बातमी समजल्यावर ती गुप्त संघटना तातडीनं हालचाली करते आणि गोळ्या घालण्याआधी काही मिनिटं तिची सुटका होते. तिला मृत्युदंड देण्यात आला, अशी बातमी सगळीकडे पसरते. त्या संघटनेला ती सापडते ती एका निर्जन स्थळी, तीही बेशुद्ध आणि हातापायांची हाडं तुटलेलया अवस्थेत. संघटना काळजी घेते. ती बरी होते आणि युद्ध संपेपर्यंत लपून राहून काम करतच राहते. "आकाशाएवढा...' हे याहून वेगळं असतं? त्या तरुण मुलीचं नाव होतं इरेना सेंडलर.

पण तिची कहाणी, तिचं काम इथंच थांबत नाही. युद्ध संपल्यानंतर स्वतःकडची यादी बाहेर काढून त्या वाचविलेल्या ज्यू बाळांना त्यांची ओळख मिळवून देण्याचं काम ती त्या संघटनेमार्फत करत राहते. अडीच हजार मुलांपैकी चारशे मुलांचा शोध लागत नाही, म्हणून हळहळत राहते. तिचं पोलंडच्या संसदेत कौतुक झालं, मानसन्मान मिळाले, तरी "मी काहीच विशेष केलं नाही,' या मतावर ती ठाम राहते. "आम ्ही तीस जण हे काम करत होतो. कौतुक साऱ्यांचंच आहे. आमच्या एका सहकाऱ्यानं मृत्युदंड स्वीकारला आहे. मी हयात आहे, म्हणून हा मान मला मिळतो,' असं तिला प्रामाणिकपणे वाटत राहतं. पोलंडच्या पंतप्रधानांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना ती म्हणते, "आपण सारेच या भूतलावर काही ना काही कारणासाठी जन्माला येतो. मी जे केलं असं सांगण्यात येतंय, कदाचित माझ्या जन्माला येण्यामागे तेच कारण असेल...' इरेना यांचं युद्धकाळातलं काम पाहूनच आपण "आकाशाएवढा...' असं म्हणू लागतो. तेथून पुढे वयाच्या सत्याण्णवाव्या वर्षापर्यंतचं त्यांचं साधं, निर्व्याज आणि निगर्वी जीवन पाहून कोणती उपमा देणार? त्यांच्याविषयी विचार करताना बुद्धी, मन- सारंच थिटं पडतं. कोणत्याही प्रकारच्या विचारांच्या चिमटीत त्या गवसेनाशा होतात. त्यांच्यावर कुठलंही "लेबल' चिकटवता येत नाही. पाहता पाहता त्या एवढ्या मोठ्या होतात, की फक्त त्या वेळचीच नाही, तर आतापर्यंतची सारी क्रूरता, सारा कोतेपणा यांना व्यापून शिल्लक राहतात.

आपलं जग सुरळीतपणे चाललंय ते अशा माणसांच्या खांद्यावर. सामान्यांना धीर देतात ही माणसं. अन्यथा लाखो ज्यूंचं शिरकाण करणारा हिटलर, मुसोलिनी, आताचा ओसामा बिन लादेन ते आपल्या गावात, शहरात खून पाडणारा एखादा पिसाट खुनी, गावगुंड यांच्या गर्दीत आपण सारे हरवून गेलो असतो. कदाचित त्यांचे गुलाम बनून राहिलो असतो. प्रसंगी आपणही प्रतिकार करू शकू, असं आपल्याही अंतर्मनात कुठेतरी वाटत असतं, त्याचं कारण इरेना यांच्यासारखी माणसं असतात. माणसातले पशू अशाच माणसांना घाबरून असतात. सामान्यांची असामान्य शक्ती त्यांना ठाऊक असते. आपल्याला मात्र नसते, हेच तर दुर्दैव.

(माझ्याच आगामी पुस्तकातून)

पह्यलं नमन....

Posted by Abhijit at 11:02 PM

Sunday, September 7, 2008

वेदांपासून संतसाहित्यापर्यंत आणि कीर्तनापासून लावणीपर्यंत सर्वत्र "पह्यलं नमन' गणपतीला केलं जातं. आजही आपण सारेच गणेशवंदनाने कार्यारंभ करतो. ही प्रथा का पडली असावी? त्यासाठी गणपतीच्या कोणत्या गुणांचा आपल्या पूर्वसुरींनी अभ्यास केला असावा? उत्तम नेतृत्वगुण, संघटनशक्ती, ज्ञानोपासना, दूरदृष्टी, निर्णयक्षमता, लहानात लहान घटकाला सामावून घेण्याची, तसेच ज्येष्ठांचा आदर राखण्याची, त्यांचा सल्ला ऐकण्याची वृत्ती आणि प्रचंड ऊर्जा-उत्साह यांसारख्या गुणांचा त्यांनी विचार केला असेल का? या गोष्टींचा आजच्या जीवनाशी काही संदर्भ लागतो का? कार्यारंभ उत्तम होणे म्हणजे पुढच्या यशाची शाश्‍वती असते का? चला... गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू या!

कुठल्याही कार्याची सुरवात गणेशाच्या पूजनाने करण्याची प्रथा आहे. इतर धर्मीयांमध्ये गणेशाचे पूजन नाही; परंतु त्या त्या परंपरेनुसार प्रार्थना म्हणून कार्यारंभ केला जातो. सहज विचार केला तर या प्रथा परंपरांची कारणमीमांसा करता येते. कोणत्याही कार्याचा आरंभ शुभ घटनेने व्हावा, हीच यामागची इच्छा असते. नाटक किंवा वगाच्या सुरवातीलाच "पहिलं नमन इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला आणि इडा मंडळीला...' करतात. म्हणजे स्थानिक देवदेवता, प्रतिष्ठित नागरिक आणि अर्थातच जनताजनार्दन! हे असं पहिलं नमन केलं की काम करणं सुकर होतं, त्यामध्ये यश मिळण्याची शक्‍यता अर्थातच अतिशय जास्त असते.

हा विचार आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवला आणि तशी प्रथा निर्माण केली. त्यांनी दाखविलेला हा रस्ता आपल्याला आजही मार्गदर्शक आहे. "वेल बिगिनिंग इज हाफ डन' अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचा अर्थ तोच. चांगली सुरवात म्हणजे निम्मं काम झाल्याची पावतीच असते! आता कंपनीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एखादं काम सुरू करताना गणेशपूजन किंवा प्रार्थना करणं शक्‍य नाही. आपल्या पूर्वसुरींना ते अपेक्षितही नाही. कार्याचा आरंभ गणेशपूजनानं करणं, या प्रथेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. त्यांनी गणेशाचीच निवड का केली असावी, इतर कोणतीही देवता का निवडली नसावी, या गोष्टींचा आपण विचार करायला हवा; तर योग्य तो मार्ग दिसेल. यासाठी पुराण कथा थोड्या बाजूला ठेवाव्या लागतील.

गणेशाचं चरित्र पाहिलं की त्याचे गुण समोर येतात. एक तर ही देवता बुद्धीची आहे. बुद्धीबरोबरच नेतृत्व, संघटना बांधण्याचं सामर्थ्य, तीक्ष्ण आणि दूरदृष्टी, प्रसंगी मानापमान बाजूला ठेवण्याची क्षमता, प्रचंड उत्साह-ऊर्जा, उंदरासारख्या लहानातल्या लहान घटकाला सामावून आणि सांभाळून घेणं, खटासी खट आणि नटखटासी नटखट राहणं, ज्येष्ठांचा आदर करणं, त्याचबरोबर प्रसंग पाहून त्वरित निर्णय घेणं, आदी गुण आपल्याला गणपतीमध्ये दिसतात. कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यासाठी या गुणांची नितांत आवश्‍यकता असते.

उदाहरणच घ्यायचं तर कंपनीच्या एखाद्या "प्रोजेक्‍ट'चं घेता येईल. समजा एखाद्या कंपनीनं विशिष्ट वस्तू बनविण्याचं कंत्राट घेतलं आहे. हे कंत्राट वेळेवर आणि उत्तम दर्जाचं द्यायचं आहे. अशा वेळी कंपनी काय करते? आपल्याच कर्मचाऱ्यांपैकी काही जणांची या कामासाठी निवड करते. आता हा कार्यारंभ उत्तम होण्यासाठी तेथे गणेशाचं म्हणजे गणपतीच्या गुणांचं अधिष्ठान असणं आवश्‍यक आहे. हे कसं शक्‍य होईल? तर संघाच्या निवडीपासून सुरवात केली पाहिजे. या संघातील सदस्यांना त्या कामाची पूर्ण माहिती, ज्ञान असणं गरजेचं आहे. फक्त माहिती असणं उपयोगाचं नाही तर ज्ञान असणं आवश्‍यक आहे. या सदस्यांमध्ये एकोपा पाहिजे, ते काम सांगितल्या वेळेत आणि दर्जानुसार पूर्ण करण्याची त्यांची मनोमन इच्छा हवी. (हॅ... काहीतरी करतात, आम्हाला विचारायला काय होतं? शक्‍य आहे का? उगाचच तोंडघशी पडणार आता... असा विचार करणारे नकोत. एक खराब आंबा टोपलीतले इतर आंबे नासवतो!) या संघाचं नेतृत्व अशाच एका कुशल कर्मचाऱ्याकडे किंवा संचालकाकडे द्यायला हवं. हा नेता सगळ्यांना सांभाळून घेणारा, प्रसंगी मानापमान दूर ठेवणारा हवा. त्याने अनुभवी लोकांच्या मताला मान दिला पाहिजे, त्याचबरोबर तो लहानातल्या लहान घटकाच्या सूचनाही लक्षपूर्वक ऐकणारा आणि त्याला मान देणारा हवा. या सर्व सूचना ऐकून त्याने गरजेप्रमाणे आवश्‍यक ते निर्णय पटापट घेतले पाहिजेत. त्याच वेळी असा निर्णय घेताना त्याचे फायदे-तोटे त्याने ओळखले पाहिजेत. काही निर्णय त्या वेळी तोटा करणारे वाटतात; परंतु पुढच्या काळात मात्र त्यांचा फायदाच होत असतो. नेता हा खटासी खट आणि नटखटासी नटखट असला पाहिजे. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नेता स्वत: उत्साहाचं-ऊर्जेचं आगर हवा. त्याच्यामुळे त्याच्या गटातील सदस्यांना स्फूर्ती मिळते. तेही पडेल ते काम उत्साहाने करण्यास सरसावतात.

आता ते काम करण्यासाठी असा संघ तयार झाला, की निम्मं काम झाल्यासारखंच असतं. नंतर उरते ती कामाची औपचारिकता. त्यांना यश मिळालं की इतरही कर्मचारी अशा प्रकारे काम करण्यास पुढे येतात. ही मंडळी काम करत असताना एक वेगळाच उत्साह-ऊर्जा निर्माण झालेली असते. ती ऊर्जा इतर कर्मचाऱ्यांनाही जाणवत असते. या मंडळींची चर्चा, त्यांचा झपाटा पाहून इतर कर्मचाऱ्यांतही तो "माहोल' निर्माण होतो. मग त्या कामाशी संबंध असो वा नसो- प्रत्येकालाच ही "असाईनमेंट' पूर्ण झालीच पाहिजे, असं वाटू लागतं. आता इतके शुभेच्छुक आणि शुभेच्छा पाठीशी असल्यावर काम पूर्ण झालंच पाहिजे, नाही का?म्हणूनच महत्त्व आहे ते पहिल्या नमनाला, अशा अर्थाने गणेशाच्या पूजनाला. कर्मकांडात न गुंतता त्या त्या व्यक्तिविशेषाचा विचार करून मार्ग शोधला की उत्तर नक्की सापडतं. गणेशाचे हे गुण अंगी बाणवले की ती व्यक्ती उत्तम प्रशासक तर होतेच, परंतु त्या संघटनेच्या गळ्यातील ताईतही होते.

या गोष्टी सर्वांनाच लागू आहेत. केवळ कंपनीच्या कामकाजातच नाही, तर घरापासून इतर कोणत्याही कामापर्यंत "टीम लीडर'पासून "टीम मेंबर'पर्यंत सर्वच असा विचार करू शकतात. नव्हे, त्यांनी तो करावा. सध्याच्या राजकीय रणधुमाळीत तर कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत सर्वांनीच अशा तऱ्हेने विचार केल्यास आजचं राजकारणाचं चित्रच पालटून जाईल! येत्या गणेश जयंतीला अशा विचारांचं तोरण चढवलं तर ते गणपतीलाही निश्‍चित आवडेल.

तुला पाहिले मी...

Posted by Abhijit at 2:08 AM

Monday, August 25, 2008

तुला पाहिले मी
नदीच्या किनारी...
तुझे केस पाठीवरी मोकळे...

मस्त कविता आणि तिला तेवढाच मस्त साज... सुरेश वाडकरांचा आवाज... सगळं कसं छान जुळून आलंय...आणखी काय बोलणार यावर..."ऐकून तर पहा...' वर जा, क्‍लिक करा आणि अनुभवा...

आणखी एक संदीप...

Posted by Abhijit at 2:47 AM

Thursday, August 21, 2008

दोन दिवसांपूर्वी आणखी एका आयटीयननं आत्महत्या केल्याचं उघडकीला आलं. पुन्हा एकदा तीच खळबळ, पुन्हा तीच चर्चा आणि पुन्हा एकदा तोच पण अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न... का? तरुण वयात उत्तम नोकरी, उत्तम पगार आणि उत्तम करिअर असताना अशा आत्महत्या का घडाव्यात?

काही दिवसांपूर्वीच संदीपनं सातव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आणि दोन दिवसांपूर्वी सरोजकुमारनं स्वतःला फास लावून घेतला. आयटी क्षेत्रात खळबळ उडविणाऱ्या या दोन घटना. संदीपच्या घटनेनंतर ब्लॉग, कम्युनिटीज आणि अर्थातच मीडियामध्ये चर्चा सुरू झाली होती. साऱ्या चर्चेचा सूर होता कशासाठी? उत्तम नोकरी असणाऱ्या, उत्तम पगार असणाऱ्या आणि अर्थातच पुढे चांगलं करिअर असणाऱ्या तरुणांनी आत्महत्या का करावी?

संदीपनं कारण दिलं होतं कामाचा ताण. सरोजकुमारच्या आत्महत्येचं कारण अजून समजलेलं नाही. तरीही या दोन घटनांमध्ये एक सूत्र दिसून येतं, ते म्हणजे "हेच उत्तर...' अशी त्यांची झालेली धारणा. या दोघांचे प्रश्‍न इतके टोकाचे असतील का? खरं सांगायचं तर आपल्याला त्याची काहीच कल्पना नाही. मुळात प्रश्‍न किती मोठा आणि किती छोटा, हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून असतं.

संदीपच्या घटनेनंतर मी स्वत:ला थोडा वेळ देऊन स्वत:कडेच पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण फक्त धावत सुटलो आहोत. कुठे धावायचं, कुठपर्यंत धावायचं आणि किती धावायचं, हे माहितीच नाही! कधीतरी दम लागतो, कधीतरी कंटाळा येतो, मन सांगत राहतं; पण मी माझं मन, मेंदू आणि शरीर या साऱ्यांनाच फक्त पिटाळतो आहे. माझी लाइफस्टाईल पूर्ण बदलून गेली आहे. मी उठतो, आवरतो आणि ऑफिसला धावतो. तिथं काम करतो. मधे कधीतरी कॅंटीनकडे किंवा बाहेर चक्कर टाकतो. कोणाशी तरी काहीतरी बोलतो. पुन्हा एकदा डेस्कवर बांधून घेतो. संध्याकाळी (खरं तर रात्री) कधीतरी कंटाळा येतो. मग मी घरी जाण्यासाठी उठतो. घरी पोचतो. ऑफिसमध्ये काहीतरी खाल्लं असेल तर तसाच झोपतो, किंवा काहीतरी पोटात ढकलून झोपतो. अर्थात घरी पोचून आडवं होण्याच्या मध्ये जो वेळ असतो ना, तो टीव्ही, लॅपटॉप किंवा सेलवर घालवतो...

स्वत:कडे तटस्थतेनं पाहिलं तेव्हा जे दिसलं, ते हे होतं. मग लक्षात आलं, अरे, बऱ्याच दिवसांत आपण एखादं छानसं गाणं ऐकलेलं नाही. ऑफिसमध्ये कोणीतरी म्हणत होतं, सारेगमपच्या लिटिल चॅम्प्समध्ये शमिका भिडेनं छान गाणं म्हटलं. "मी गाताना गीत तुला लडिवाळा...' अंगावर काटा आला... मग मी कसं ऐकलं नाही ते? मला का नाही जाणवलं असं काही? तर तेव्हा मी सेलवर मेसेज पाठवत होतो. मेसेज पाठवता पाठवता जे कानावर आलं, तेवढंच ऐकलं मी!

पूर्वी आपण मनाचा खूप विचार करायचो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल आणि अर्थातच स्वत:च्या मनाला पटेल की नाही. आजकाल आपण हा विचार विसरलोत का? का मन नावाची शरीरात कुठेही दाखविता न येणारी गोष्ट आपण विसरून गेलोत? किती दिवसांपूर्वी आपण शांतपणे बसून शेवटचं गाणं ऐकलंय? पूर्वीच्या कट्ट्यावर बसून मित्रांबरोबर गप्पा मारल्यालाही अनेक महिने उलटून गेलेत. एखादी छान कथा वाचली नाही, की नाटकही पाहिलं नाही... खरंच, ऑफिस आणि घर... उरलेल्या वेळेत ऑनलाईन, एवढंच आयुष्य आहे का आपलं?

असं का झालंय?

एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या गीतानं याविषयी प्रतिक्रिया पाठवली आहे. ती म्हणते, "अस्थिरता, कामाचं प्रेशर, आ वासून बसलेल्या डेडलाइन्स, घरच्या जबाबदाऱ्या, हे दुष्टचक्र आता गंभीर रूप घेतं आहे. या साऱ्याच्या मुळाशी अभाव आहे तो संवादाचा. कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललंय. सॉफ्टवेअरमध्ये मिळणारा पगार पाहून प्रत्येकाला इथं येण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे; पण त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते आहे. एखादा संदीप क्षणात सगळं संपवतो, तर त्याच्यासारखे अनेक जण रोज थोडं थोडं मरत असतात.

प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग झालाय. अचानक आलेली पावसाची सर, नुकतंच उमललेलं फूल, जुन्या आवडत्या गाण्याची धून... सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्‍य का बनल्या आहेत? आयुष्य म्हणजे ट्रॅफिक जाम, खणलेले रस्ते, डेडलाइन, ईएमआयचे चेक... असं का झालंय?'

संदीपच्या निमित्तानं...

Posted by Abhijit at 10:49 PM

Sunday, August 17, 2008

७ ऑगस्ट २००८.
सकाळी सकाळी एस.एम.एस. आला. पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या अभियंत्यानं कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. संदीप शेळके हे त्या युवकाचं नाव. त्यानं आत्महत्त्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. "कामाच्या अतिताणामुळे' हे आत्महत्त्येचं कारण त्यानं दिलं होतं.

घटना आदल्या दिवशी म्हणजे ६ ऑगस्टच्या रात्री घडली होती. नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ही बातमी झपाट्यानं सगळीकडे पसरली. आणि सुरू झाली न संपणारी चर्चा.

पुणे प्रतिबिंब या ब्लॉगवर आठ तारखेला एक पत्र पोस्ट करण्यात आलं होतं. पत्र संदीपलाच लिहिलं होतं. त्यात कामाचा ताण, मानसिक ओढाताण आणि त्यातून घडलेली ही घटना यासंबंधाने काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरची उत्तरं शोधण्याचाही प्रयत्न केला होता. या पोस्टवर अनेक कॉमेंट्‌स आल्या. आटीयन्सपासून ते एक आई, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून, सामाजिक स्तरांमधून या प्रतिक्रिया उमटल्या. घडलेल्या घटनेबद्दल सगळ्यांनाच वाईट वाटतंय; पण आता तेवढंच वाटून उपयोग नाही. या घटनेचा आता गांभीर्यानं विचार व्हायला हवा. मुळात कामाचा अतिताण, आजच्या भाषेत सांगायचं, तर वाढती "वर्क प्रेशर्स' हा मुद्दा आजपर्यंत अनेकदा चर्चिला गेला आहे. माध्यमांतून त्यावर विविध लेखही प्रसिद्ध झाले आहेत. खूप ताण येतोय, त्यामुळे आपण तुटत चाललो आहोत, हेही सगळ्यांना जाणवतंय. फक्त हा विषय आजच्यासारखा ऐरणीवर आला नव्हता. आत्महत्त्येसारखी गंभीर घटना घडल्यानंतर मात्र, सगळ्यांचा आपल्याच ताणाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलाय, हे आलेल्या प्रतिक्रियांवरून जाणवतं.

तुटेपर्यंत ताणलंय
मुळात हा प्रश्‍न फक्त आयटीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अतिशय वेगानं धावणाऱ्या या जगात ताण सगळ्यांच्याच बोकांडी बसले आहेत. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत. सगळ्याच क्षेत्रात विलक्षण स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकायचं आणि पुढेही जायचं अशी ही दुहेरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत साऱ्यांचाच कस पणाला लागतो. ही स्पर्धा म्हणजे चरक झालाय आणि आपण ऊस! सगळंच स्वत्व पिळून निघाल्यानंतर आपलं चिपाड होईल नाहीतर काय? आत्महत्त्येचा प्रसंग आताच घडला; पण आपण स्वत:ला तुटण्यापर्यंत ताणलंय, याची लक्षणं आधीपासूनच दिसायला लागली होती. घरात सतत होणारी चिडचिड, अगदी छोट्याशा गोष्टीवरूनही तडकणारं डोकं, बऱ्याचदा जाणवणारा थकवा, डोकं दुखण्याचं वाढलेलं प्रमाण ही सारी याचीच तर लक्षणं होती. याविषयी सगळेच मानसोपचार तज्ज्ञ पोटतिडकीनं बोलत होतेच. आपण आतातरी जागं व्हायला हवं. आपलं स्वत:कडचं हे दुर्लक्ष अक्षम्यच आहे. याचे परिणाम आपण तर भोगतोच; पण आपल्या आजूबाजूच्यांनाही भोगायला लावतो. हे "पॅसिव्ह स्मोकिंग'सारखं आहे. सिगारेट आपण ओढायची आणि त्याचे भोग आपल्याबरोबरच इतरांनीही भोगायचे, अतुलची ही प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे.

पण ताण असतोच!
ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी बहुतेक साऱ्यांनीच "आयटीमध्ये ताण असणारच' असा उल्लेख केला होता. एकानं नाव न देता प्रतिक्रिया दिली, "प्रेशर्स सगळ्यांवरच असतात. मॅनेजर्स आम्हाला अक्षरश: राबवून घेतात. पण त्यांनाही पर्याय नसतो. त्यांचे बॉसेस त्यांच्यावर दबाव आणतात आणि ते आमच्यावर. यातून कोणाचीही सुटका नसते. मला कधीकधी खूप राग येतो; पण काही पर्यायही नसतो.' ही प्रतिक्रियाही बोलकी आहे. ताण असणार हे यानं मान्य केलंय, फक्त काही पर्याय नाही, हे मात्र चूक आहे. कारण एकदा ताण घ्यावा लागणार आहे, हे मान्य केलं, की तो सोसायचा कसा, कमी कसा करायचा हेही शोधायलाच हवं ना? पण तसं घडताना मात्र दिसत नाही. कॅप्टन सुभाष हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी आताच्या पिढीचं बारकाईनं निरीक्षण केलंय, असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून वाटतं. ते म्हणतात, "आजकालची हुषार तरुण पिढी जरी नवी नवी शिखरे पादाक्रांत करत असली, तरी त्यांना पूर्वीपेक्षा अतिशय जास्त प्रमाणात ताणतणावाखाली, वेळीअवेळी आणि प्रोजेक्‍ट डेडलाइनच्या टांगत्या तलवारीखाली नोकऱ्या कराव्या लागतात. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही लॅपटॉपवर करण्यासाठी काम असतंच. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्यात अडकल्यामुळे इंटरनेट, आयपॉड, मोबाईल अशी वेगवेगळी गॅजेट्‌स सतत हाताळण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांना एक क्षणही विश्रांती घ्यायला फुरसत नसते.'

वेळ काढलाय कधी?
सुभाष यांचं म्हणणं तुम्हा-आम्हालाही पटेल. आपण स्वत:साठी वेळ काढायलाच विसरून गेलो आहोत, असं कधीकधी वाटतं. ज्या कॉलेजच्या मित्रांबरोबर आपण दिवसरात्र हुंदडलो, त्यांना आपण किती वेळ देतो? नोकरी करण्याआधी अधेमध्ये डोंगरदऱ्यांत भटकंती करायला जायचो. जाम धमाल करायचो. आता तसं जमतं? रात्री जेवण झाल्यावर निवांत चालत चालत फिरायला कितीदा गेलो आहोत? आपल्या जिगरी दोस्ताला फोन, एस.एम.एस. आणि इमेल सोडून कितीवेळा भेटलो आहोत? आईसाठी, कुटुंबासाठी किती वेळ दिलाय आपण? अर्थात, लग्नकार्य किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम आणि हॉटेलिंग सोडून! आईशी शेवटच्या निवांत गप्पा कधी मारल्यात आपण आठवतंय? यादी काढायला गेलो, तर खूपसारे प्रश्‍न आहेत. व्यक्तीनुसार या यादीत बदल होतील. हे प्रश्‍न आपल्याला पडत नाहीत का? कधीतरी नक्कीच पडतात. काम करता करता आपण "कलिग'ला तसं म्हणतोही. "यार बहोत दिन हुए कहीं घूमने नहीं गया... अब थोडासा ब्रेक चाहिये...' फक्त हे सारं बोलण्यातच राहतं. आणि मुद्दा इथंच आहे.

योगा, मेडिटेशन...
मधे एक मेल फिरत होती सगळीकडे. अनेक मेलच्या गर्दीत ही लक्षात राहिली. कोणीतरी अनामिक व्यक्तीनं खूप छान लिहिलं होतं त्यात. "एच.आर. कडून मेल आला. अमुकअमुकचं काल हार्टफेलमुळे निधन झालं. इतक्‍या तरुण वयात हार्टफेल...' आपल्यापैकी काहींना आठवत असेल तो मेल. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीच ही मेल सगळीकडे फिरत होती. फक्त झालं एवढंच आपण ती वाचली, थोडं हळहळलो आणि इतरांना फॉरवर्ड केली. "लंच टाईममध्ये' इतरांशी थोडी चर्चा केली. सध्या अशा चर्चांचा शेवट ठरलेल्या वाक्‍यांनी होतो, "मेडिटेशन आणि योगा इज अ मस्ट!' ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी २५ टक्के प्रतिक्रियांमध्ये हाही उल्लेख होता. आपल्यावर असणारे ताण, त्यामुळे होणारा त्रास या साऱ्यावर हे दोन उपाय म्हणजे रामबाण आहेत, असं काहीसं वाटतं आपल्याला. पण ते पूर्ण खरं नाही. म्हणजे सकाळी मेडिटेशन करायचं. "योगा'च्या क्‍लासला जायचं आणि दिवसभर घाण्याला जुंपून घ्यायचं, यानं मन:शांती मिळत नाही. ती काही "डिस्प्रिन'नाही. "योगा' आणि "मेडिटेशन' हे मन:शांती देतील; पण त्यासाठी उरलेल्या दिवसाचं नियोजनही तसंच हवं. आजकाल आपला "डिस्प्रिन'वर जास्त विश्‍वास बसत चाललाय. गोळी घेतली, डोकेदुखी थांबली. मुळात डोकं का दुखत होतं, हे शोधायचे कष्ट आपण कोणीच करत नाही. आणि "योगा', "मेडिटेशन' आणि आयुर्वेद हे रोग शोधण्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणूनच आठवड्यातून तीन दिवस, सकाळी किंवा संध्याकाळी दोन तास या क्‍लासेसना जाऊन उपयोग नसतो. या आधीच्या परिच्छेदात जे प्रश्‍न विचारलेत ना, त्याची उत्तरं आधी देता यायला हवी. आपल्या "लाईफ'मध्ये तसा बदल घडायला हवा. तरच या उपायांचा उपयोग होईल.

शेवट... नाही सुरवात
ब्लॉगवरील प्रतिक्रिया आणि त्यानिमित्तानं असलेला लेख हा काही उपदेश नाही. तो माझा आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न आहे. या साऱ्यांत मीही येतोच ना! आपण सारेच धावत सुटलो आहोत. नक्की काय मिळवायचंय हे आपलं आपल्याशी निश्‍चित नाही. ठरवलेला "गोल अचिव्ह' केला, की आपण तिथं थोडा वेळ रेंगाळत नाही. यशाचा आनंदही साजरा करत नाही. कारण तिथं उभं राहिल्यानंतर आणखी पलिकडची गोष्ट दिसत असते. मग ती मिळविण्यासाठी आपण सारेच आटापिटा करतो. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण कुठवर धावायचं, का धावायचं हे स्वत:शीच निश्‍चित करायला हवं. ब्लॉगवर "मेसअप इन थॉट' अर्थात "वैचारिक गोंधळ' या नावानं एक प्रतिक्रिया आली आहे. त्याचं म्हणणं आहे, "आपण अशा प्रकारे विचार केला आणि तसं वागू लागलो, की कधीतरी वाटतं, आपण स्वत:ला बांधून घेत नाही ना? आणखी काही करण्याची, मिळविण्याची शक्‍यता असताना स्वत:वर बंधनं घालणं किती योग्य आहे?' मुद्दा चूक नाही; पण हे काय किमतीवर, हे वाक्‍य पुढे जोडायला हवं. फिरून फिरून तोच मुद्दा समोर येतो, किती ताणायचं? आपण मिळवत असलेला पैसा आपल्याला एंजॉय करता येत नसेल, ज्या पोटासाठी हे सारं करतो त्यात "मिळेल ते' ढकलावं लागत असेल, कुटुंबाबरोबर चार क्षण घालवता येणार नसतील, आपल्या "बच्चू'ला फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तयार करण्यातली मजा लुटता येणार नसेल आणि मुख्य म्हणजे स्वत:साठीही वेळ देता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा कशासाठी? आजचे हे श्रम आणि त्यातून मिळणारं उत्पन्न पुढे आरोग्यावरच खर्च करायचं आहे का?
सकाळी उठलो, रोजच्या व्यायाम केला, आन्हिकं आवरली, सगळ्यांबरोबर हसत-खेळत नाष्टा केला, ऑफिसला आलो, मस्तपैकी काम केलं, संध्याकाळी घरी पोचलो, पिलाला घेऊन बागेत गेलो, त्याच्याबरोबर चक्क फुगा खेळलो, रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसलो.... हा दिनक्रम आपल्याला नको असतो का? माझ्या या लेखाचा, खरंतर स्वगताच ा शेवट या सुंदर दिनक्रमाच्या सुंदर स्वप्नानंच होणं योग्य आहे. फक्त हे स्वप्न ?हे, ते लवकरात लवकर प्रत्यक्षात यावं, ही भाबडी वाटली, तरी योग्य आशा आहे. म्हणूनच संदीपच्या जिवाची किंमत मोजून सुरू झालेली ही चर्चा हा शेवट नाही. ती सुरवात आहे सुंदर भविष्याची!

प्रिय संदीप,

Posted by Abhijit at 10:40 PM

Thursday, August 7, 2008

काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' या विषयावर चर्चा सुरू होती. खरंच एवढा ताण होता का रे तुझ्यावर? अगदी सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवण्याएवढा? मुळात खरंच कोणावर एवढा ताण असतो का रे? एका कणखर आईचा मुलगा इतका हळवा असू शकतो?

काल सकाळी सकाळी बातमी ऐकल्यानंतर तुझ्या विषयीची माहिती वेगवेगळ्या लोकांकडून, चॅनेलवरून कानी यायला लागली. तुझा ऑर्कुटचा प्रोफाईलही पाहिला. तुझे टेस्टिमोनिअल, तुझे स्क्रॅप खरंच दृष्ट लागावे एवढे होते. सीबीएससी बोर्डात तू झळकलास, त्यानंतर एका कॉलेजनं तुला बोलावून घेतलं, तुला ऍडमिशन दिली, पुढे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करू लागलास, नंतर त्याच कंपनीनं तुला एम.टेक. करण्यासाठी आय.आय.टी.मध्ये पाठवलं. तिथंही झळकलास. परत आल्यावर त्याच कंपनीत पुन्हा नोकरी करू लागलास. तुला ओळखणारे आताही सांगतात, की संदीप हा खूप चांगला मुलगा होता. खूप पोलाईट, खूप व्यवस्थित...

मित्रा, तुझ्यावर कंपनीचा विश्‍वास होता. तुझाही कंपनीवर होता. मग नक्की प्रॉब्लेम आला कुठे? अरे सातव्या मजल्यावरून उडी मारताना तुला तुझ्या आईचे कष्ट आठवले नाहीत का? धाकट्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर नाही आला? अरे काबाडकष्ट करून ज्या माऊलीनं तुला एवढं शिकवलं, मोठं केलं, तिची काय अवस्था होईल तुझ्या मागे, याचा विचार का नाही केलास? तुझं कर्तृत्व आता कुठे बहराला येत होतं. ती आई कौतुकानं तुझ्याकडे पाहात होती. तिला केवढा मोठा धक्का बसलाय रे...

अख्खं आयुष्य होतं तुझ्यापुढे. ताण-ताण तो कसला रे? ताण कोणाला नसतात? कदाचित तुला हसू येईल; पण सगळ्यात जास्त ताण कोणावर असतो ठाऊक आहे तुला? आपल्या बस ड्रायव्हर्सना. आपलं पुण्यातलं ट्रॅफिक तर ठाऊक आहेच तुला. कधी कोण कुठून घुसेल याचा नेम असतो का? त्यात ती अवजड बस. त्यामध्ये असलेले 50-60 पॅसेंजर्स. अरे त्याचा थोडादेखील मानसिक तोल ढासळला, तर काय होईल माहिती आहे? रोज सकाळी गाडी सुरू केल्यापासून ते ड्यूटी संपेपर्यंत तो माणूस किती प्रचंड ताणाखाली असेल... त्यात पगार आणि सुट्ट्यांच्याबाबत तो तुझ्या-माझ्यापेक्षा कमनशिबीच ना रे...

तुझ्यावर असा कोणता मोठा ताण होता. वर्कप्रेशर होतं, असं तू शेवटच्या एसएमएसमध्ये लिहिलंस. ते तू कमी करू शकत नव्हतास का? बॉसला सांगू शकत नव्हतास? बरं एकंदर ऐकलेल्या बातम्यांवरून तुझं कंपनीत वजन असावं, असंच वाटतं. कदाचित बॉसनं ऐकलं नसतं, तर तू अजून कोणाला तरी सांगू शकत होतासच ना? कितीतरी मार्ग असतात रे. त्यातला एकतरी ट्राय करावा असं तुला का वाटलं नाही? अरे एवढं मस्त करिअर असणारा, शिक्षण असणारा, आयआयटीयन असणारा तू, ही नोकरी सोडली असतीस, तरी तुला आणखी चार मिळाल्या असत्या. कोणाशी बोलला असतास तरी सांगितलं असतं, तुला कोणीही... तू कोणाशीच का बोलला नाहीस? आत्महत्त्या केलीस त्या दिवसभरातही तू मस्त होतास. सगळ्यांशी हसून खेळून बोलत होतास. पण तुझ्या मनात असं काही खदखदत होतं, हे कोणाला ठाऊक.

बोलायचंस रे मित्रा बोलायचंस... कोणाशीतरी बोलायचंस... फक्त पुण्यामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये हजारो मुलं काम करतात. त्यांच्यावरही ताण असेलच ना रे... मित्रा, ताण कमी करण्यासाठी, चिलआऊट होण्यासाठी विकएंड असतात ना... कधीतरी शांत बसायचंस. कधीतरी निवांत फिरायला जायचंस. कधीतरी एखादा पिक्‍चर एंजॉय करायचास. एखाद्या जिगरी दोस्ताकडे मन मोकळं करायचंस. अगदीच नाही, तर तुझ्या कणखर आईकडे बघायचंस...

आम्ही असंच काहीतरी करत असतो ना. कामाचा ताण आहे किंवा टेन्शन आलं म्हणून कोणी आत्महत्त्या करतात का? तुझ्यासारख्यानं प्रश्‍नांना भिडायचं का आत्महत्त्या करून पळ काढायचा? हे जग खूप सुंदर आहे. एवढा देश-परदेश फिरलास, तुला ते सौंदर्य दिसलं नाही का रे? मी फक्त लौकिक अर्थाचं सौंदर्य म्हणत नाहीये. माणसंही खूप चांगली असतात रे. किमान माझातरी यावर विश्‍वास आहे.

आपली काही ओळख नाही. पण तुझी बातमी ऐकल्यानंतर तुझ्याशी बोलावंसं वाटलं, म्हणून हे पत्र. तुला आता विचारलेत ना त्यापेक्षाही खूप प्रश्‍न आहेत मनात; पण तूच नाहीस उत्तरं द्यायला. दूर कुठेतरी अनंतात निघून गेलाहेस. त्यामुळे माझ्यापुढे पर्याय एकच आहे, आपली उत्तरं आपण शोधण्याचा. तुझ्या वैयक्तिक प्रश्‍नांबाबतचं सांगता येणार नाही; पण स्ट्रेस बाबत मी माझं उत्तर शोधलंय. मी ठरवलंय आता, सुटीच्या दिवशी फक्त सुटी... नो ऑफिस. घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या ना की निम्मा शीण जातो. मित्र, कट्टा, हॉटेलिंग सगळं काही मस्त ठेवणारे मी. मुळात मी किती धावायचं याची सीमाच ठरवून घेणार आहे. माझ्या लक्षात आलंय. आपण ना नुसतं धावत सुटतो. अगदी छाती फुटेपर्यंत धावतो. मग दमतो. आपला वेग कमी होतो. तो कमी झाला, की मागचा कोणीतरी पुढे जातो. ते आपल्याला सहन होत नाही. मग आपण पुन्हा जोरानं धावायला जातो. पण तोपर्यंत आपली छाती फुटलेली असते. वेग अगदी सुरवातीला होता, तेवढाही राहात नाही. मग येते प्रचंड चिडचिड, निराशा आणि स्ट्रेस... हे होण्याआधीच आपण थांबू शकतो ना? मग आता तिथंच थांबायचं. किमान मी माझ्यापुरतं तरी असंच ठरवलंय. मस्त काम आणि जबरदस्त मजा. अरे घरच्यांबरोबर राहायला वेळ नसेल, एवढं सुंदर आयुष्य एंजॉय करता येत नसेल, तर एवढा पैसा कमवायचा तरी कशासाठी?तुझ्या त्या बातमीतून मी एवढं तरी शिकलो. फक्त माझ्या या शिक्षणाची किंमत खूप मोठी होती... तुझा जीव... सॉरी संदीप... रिअली सॉरी...

तुझा
अभिजित

वारी, वारकरी

Posted by Abhijit at 2:40 AM

Saturday, June 28, 2008

पंढरीच्या भेटीसाठी निघालेल्या ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या आणि हजारो वारकरी यामुळे महाराष्ट्र भावभक्तीच्या आनंदानं कोंदून गेलाय. पांडुरंगाच्या समचरणी लीन होण्यासाठी आतुर झालाय. किमान एक हजार वर्षाची परंपरा असणारी ही वारी म्हणजे एक आश्‍चर्यच आहे. हजारो माणसं जमतात काय आणि एका शिस्तीत देहू, आळंदी ते पंढरपूर पायी जातात काय. बरं यासाठी कोणी कोणाला आमंत्रण धाडत नाही, की मानधनही देत नाही, तरीही इतकी वर्षे हा सोहळा त्याच शिस्तिनं चालू राहतो तरी कसा, असा आचंबा सध्याच्या काळात वाटतोच.

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारी ती नैतिकतेची पाठशाळाच आहे. ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचं ज्ञानस्वरूप उभं केलं, तर भोळ्या भाविकांनी त्याचं भावदर्शन अनुभवलं. नामदेव महाराज एका अभंगात वर्णन करतात,
ज्ञानियांचे ज्ञेन, ध्यानियांचे ध्येय।
पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तु।
जे तपस्वियांचे तप, जे जपकांचे जाप्य।
योगियांचे गौप्य, परमधाम।
ते हे समचरण उभे विटेवरी।
पहा भीमातीरी विठ्ठलरूप।।
ज्याला ज्ञानाने जाणायचं ते म्हणजे ज्ञेय, तर ध्यानानं गाठायचं आहे ते ध्येय. असं ज्ञानियांचं ज्ञेय, ध्यानियांचं ध्येय, तपस्वियांचं तप, जपकांचं जाप्य, योगियांचं गौप्य जिथे विटेवर समचरण उभं आहे, त्याला प्रेमानं आलिंगन देण्यासाठी निघालेला वैष्णवांचा महामेळा म्हणजे वारी.

परब्रह्माला साठवत विवेकाच्या दिशेनं होणारी उन्नत वाटचाल म्हणजे वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेनं पडणारं विवेकी पाऊल म्हणजे वारी. प्रत्येक क्रियेमध्ये साधन आणि साध्य या दोन बाजू असतात. साधनेनंच साध्य गाठायचं असतं. साधन आणि साधना खडतर असते, तर साध्य हे आनंदरूप. वारीच्या वाटचालीत साधन आणि साध्य हे दोनीही आनंदरूपच. ज्ञानरूप परमात्मा हे साध्य, तर भक्तिरूप वाटचाल हे साधन. तुकोबा म्हणतात,
होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।
काय करावी साधने। फळ अवघेचि येणे।
अभिमान नुरे। कोंड अवघेचि पुरे।
तुका म्हजे डोळा। विठो बैसला सावळा।

वारीचा भाव असतो, प्रेमभाव. वारीत चालता चालता द्वैत कधी संपते आणि अद्वैत कधी निर्माण होते, हे वारकऱ्यालाही कळत नाही. मी, माझं असा आपपर भावच शिल्लक राहात नाही. मग चालणारा माऊली, वाढणारा माऊली, पाहणारा माऊली, टाळ वाजवणारा माऊली असं होऊन जातं. तो विशाल जनसागर माऊली होऊन जातो आणि संथपणे वाहात राहतो प्रेमभाव. वारकरी विठ्ठलाला आईच्या, माऊलीच्या रूपात पाहतात. आई आणि लेकरं एकरूप झाली, की प्रेमाचा पान्हा फुटणारच ना... या प्रेमपान्ह्यात न्हात न्हात पावलं पुढे चालत राहतात. कधी फुगडी खेळत तर कधी रिंगण घालत... एकमेकांच्या पायी लागत, एकमेकांना आधार देत हा जनसागर आंदोळत पुढे चालत राहतो, तेव्हा ज्ञानेश्‍वर माऊलींनी शेकडो वर्षांपूर्वी मागितलेल्या भिक्षेचं मोल समजतं,
भिक्षेची ही झोळी। नामधर्म मेळी।
प्रेमाची आगळी। सोयरीक।
प्रेम द्यावी भिक्षा। प्रेम घ्यावी भिक्षा।
प्रेम हीच भिक्षा। द्यावी मज।।

वारी ही "पिकनिक' नाही. ती चिंतनशील जाणिवेचं अंतरंग उलगडणारी लोकशाळा आहे. स्टिफन कॅव्हेनं "सेव्हन हॅबिट्‌स' सांगितल्या आहेत. वारीने याआधी किमान हजार वर्षे पुढील सेव्हन हॅबिट्‌स सांगितलेल्या आहेत 1) माणसातल्या देवत्वाला ओळखून समता अंगी बाणवेन. 2) अभ्यासाशिवाय झोपणार नाही. 3) स्वीकारलेलं काम देवपूजा मानून करीन. 4) आई-वडील, गुरू-अतिथींचा मान राखेन. 5) समाजाला विधायक प्रकल्प देईन. 6) चारित्र्याला विठ्ठल समजेन. 7) कालमान ओळखून सद्‌वृत्तीने वागेन.
ही वारीची सप्तपदी आहे. आत्मप्रकाशाच्या लख्ख वाटांनी चालत चालत हे सारं आपण शिकायचं, समाजाला शिकवायचं, विश्‍वाला आपलेपणाचं नवं सार्थ भान द्यायचं. समाज एकात्म करायचा. यातून सामाजिक - सांस्कृतिक संचित समृद्ध करायचं, यासाठी देवाला भेटायचं ही कल्पना केवढी भव्य आहे!

पालखी कशासाठी? पालखी म्हणजे जीवनमूल्यांना विनम्र भावाने दिलेला उजाळा. "मी'पणा सोडून जीवनमूल्यं खांद्यावर घेऊन समाजविकासासाठी अथक प्रयत्न करण्याला "पालखीबरोबर जाणं' म्हणतात. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचं अंतिम मूल्य. नामदेव म्हणजे सगुण भक्ती. एकनाथ म्हणजे प्रपंचाचा आदर्श. तुकाराम म्हणजे सक्रिय नामसाधनेचा श्रेष्ठ आदर्श. ही सारी जीवनमूल्यं आजही गरजेची आहेत. ही सारी आमच्यासाठी पालखीत आहेत. ती आमच्यात रुजवायची आहेत किंवा ती आपल्याला प्रतिवर्षी नूतन करून घ्यायची आहेत. त्यासाठी पालखीबरोबर जायचं. माउलींच्या पादुकांवर मस्तक टेकवायचं. कारण मस्तक हे संस्कृतीचे पुस्तक आहे आणि पादुका या संपूर्ण व्यक्तित्त्वाचा प्राण आहे. म्हणून संतांच्या पायी लागून स्वत:ला "चार्ज' करून घ्यायचं. संतांचं अस्तित्व त्यांनी दिलेल्या मूल्यांत असतं. अशी मूल्यं समाजाच्या विकासाला उपयुक्त ठरतात. यातून जो "अवेअरनेस' येतो तो महत्त्वाचा असतो. साऱ्या संतांच्या पालख्या वाखरीच्या रिंगणात येतात. त्या वेळी संतांची नाती मानवाला नैतिक शिक्षण देतात. "सोपानकाका आले', "मुक्ताई-जनाई आल्या', "गोरोबा आले', "सावंतोबा-चोखोबा आले' याला केवढा व्यापक अर्थ आहे! "आले' या एका क्रियापदात सारे आले. संतत्वाचा सारा माहोल यामध्ये भावार्थ होऊन येतो. तो प्रतिमा बनतो. या प्रतिमा सांस्कृतिक अन्वयाला साह्य करतात. माणसामाणसातली नाती घट्ट आणि बोलकी होतात. त्या त्याला जगण्याचा वर्तमान देतात.

टाळ-पखवाजांच्या घोषातला माउलींचा गजर मनाला आश्‍वस्त करतो. माणसाला नवं बळ देतो, पुन्हा नवं सामर्थ्य देतो. याचं कारण माउलींनी दिलेले मार्दव; त्यांची विनयशीलता, त्यांची अहिंसा ही मूल्ये आजही वारीतून मिळतात.ज्ञानेश्‍वर माऊली या मार्गावर रंगले आणि गाऊ लागले,
अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिही लोक।
जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा आपुलिया।।
वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली. ग्रंथातील अद्वैतता कृतीत आली. सदाचाराचा व्यापार फुलला आणि अवघा संसार सुखाचा झाला. या वारीत देव देवपण विसरतो. भक्त भक्तपण विसरतो. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचं रिंगण फुलतं. लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो. देहाची इंद्रायणी शुद्ध होते. सोन्याचा मनपिंपळ सळसळतो, भीमातीर दाटू येतो. आत्मप्रभेतला विठ्ठल आलिंगतो अन्‌ हात सहज जुळतात नि गातात "तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।'

ड्रीमगर्लची जीवनगाथा

Posted by Abhijit at 3:24 AM

Monday, June 9, 2008

"पूर्वायुष्याचा तटस्थपणे विचार करण्याची तयारी असली, तरच आत्मकथन करण्यात अर्थ आहे...'' ड्रीम गर्ल हेमामालिनीची जीवनगाथा पुण्यातील अमेय प्रकाशनने मराठीत आणली आहे. त्यातील निवडक उताऱ्यांचे वाचन ई-सकाळवर ऐकायला मिळतं.

ऑडिओसाठी इथे क्‍लिक करा.

माझी तिखट गोड खाद्ययात्रा...

Posted by Abhijit at 11:08 PM

Sunday, June 8, 2008

आपल्याला तोंड दिलंय ना, ते चावण्यासाठी (दोन्ही अर्थानं) यावर माझा भक्कम विश्‍वास आहे. त्यामुळे कुठे, कोणत्या वारी आणि किती वाजता काय मिळतं, याकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं आणि त्यानुसार त्या त्या वेळी तिथे तिथे जाऊन त्यावर ताव मारणं हे आद्य कर्तव्य ठरतं. (जिज्ञासूंनी येऊन पोटाचा घेर मोजावा!) त्यातच नोकरीच्या निमित्तानं बरीच भटकंती झाली. त्यामुळे तिथे मिळणाऱ्या पदार्थांचाही शोध घेतला गेला. ब्लॉगच्या निमित्तानं या साऱ्याला उजाळा देण्याची संधी मिळते आहे.

खाण्याची आवड असली, तरी स्वयंपाकाबाबत कायमचा कंटाळा! म्हणजे बॅचलर असतानाही "चहा' या विषयापुढे धाव गेली नाही. कधीकधी मेसचा कंटाळा आला, तर मित्रांनी मिळून केलेले भाताचे विविध प्रकार! (लावलेली वाट...) आणि शोधलेले शॉर्टकट. सहज आठवलं. मी बेळगावला असताना नारळाची बर्फी करायचं ठरवलं! कृती अगदी सोपी वाटली. नारळ खोवायचा, साखरेचा पाक करायला ठेवायचा, त्यात खोवलेला नारळ घालायचा, ते मिश्रण आटवायचं आणि ताटात पसरून थंड करायचं! आहे काय त्यात? (त्यावेळी लग्नं झालं होतं. त्यामुळे एवढी आयुधं घरात होती; पण बायको पुण्याला आल्यानं आम्ही बॅचलरच होतो.) मी तयारीला लागलो. नारळ खोवण्याची माझी स्टाईल पाहून एक मित्र मदतीला धावला. मग आम्ही दोघांनी मिळून तीन नारळ खोवले. अर्धा किलो साखर गॅसवर ठेवली. जळाल्याचा वास आल्यानंतर त्यात पाणीही घालायचं असतं हे समजलं. (च्यायला ***, नीट वाचायला काय होतं तुला? इति मित्र) एकदाचा पाक झाला. त्यात नारळ घातला. आम्ही पिक्‍चर बघत पसरलो. होता होता तीन एक तास झाले. मिश्रण काही घट्ट होईना. आता गॅस संपतो की काय, अशी भीती वाटायला लागली. अखेरीस चार तासांनंतर ते मिश्रण गॅसवरून उतरविण्यात आले. ताटात घालून थंड करण्यासाठी ठेवण्यात आले. (मरूदे... बघू गार झाल्यावर!) दोन दिवसांनंतरही ते तसंच थबथबीत होतं! या अनुभवावरून लक्षात आलं असेलंच, की आमचा करण्यापेक्षा खाण्यावर भर.

काल याच विषयावर विचार करता करता लक्षात आलं. (मी विचार करतो...!) ही खाद्ययात्रा शाळेपासूनच सुरू झाली. मी आधी नवीन मराठी (पहिली ते चौथी), नंतर रमणबाग. त्यातील नवीन मराठी सोडून देऊ. रमणबागेच्या बाहेर सूर्यकांत कुल्फी, उन्हाळ्यात काकडी, शाळेच्या बाहेर कॉर्नरला असलेल्या बेकरीतला क्रिमरोल आणि चौकात समोर असलेल्या दवे स्वीटमार्टमधले सामोसे (सध्या तिथे बेकरी नाही. कुल्फी आणि समोसे मिळतात. त्यांची चव अजूनही तशीच आहे.) अशी खाद्ययात्रा सुरू झाली. तिचा प्रवास आता "स्टार्टर' (पक्षी : चकणा. यातही खूप सुंदर प्रकार आहेत, आठवताहेत. त्याविषयी पुन्हा केव्हातरी.) पर्यंत येऊन ठेपलाय.

याच प्रवासाच्या सुग्रास आठवणींमध्ये मी रमणार आहे, तेही तुम्हाला बरोबर घेऊन. (काय दिवस आलेत.... असं वाटलं ना?) ही फक्त खाद्य यात्रा नाही. त्याबरोबर तिथल्या आठवणी, वातावरण यांचाही वेध घेण्याचा छोटासा प्रयत्न. मधेमधे काही पदार्थांच्या समजलेल्या रेसिपिज. (बर्फीसारख्या नाहीत!) आता इथेच थांबतो. बाकीचं पुन्हा केव्हा तरी...

भय इथले ...

Posted by Abhijit at 1:04 AM

Friday, June 6, 2008

भय इथले संपत नाही

मज तुझी आठवण येते...

मी संध्याकाळी गातो

तू मला शिकविली गीते...

ते झरे चंद्र सजणांचे

ही धरतीभगवी माया

झाडांसी निजलो आपण

झाडात पुन्हा उगवाया...

- ग्रेस

मला हे गाणं सापडलं नेटवरच! साऱ्यांनीच आस्वाद घ्यायला हवा, म्हणून ऐकून तर पहा... मध्ये टाकलंय। नक्की ऐका...

फक्त थोडा वेळ...

Posted by Abhijit at 11:24 PM

Thursday, June 5, 2008

एक होता लेखक. रोज पहाटे तो समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लिहीत बसे. त्याआधी समुद्रकिनारी फिरण्याचाही त्याचा नेम होता. एके दिवशी फिरताना समुद्रापाशी एक माणूस नाचत असल्यासारखा लयबद्ध हालचाली करताना त्याला दिसला. त्याने कुतूहलाने जवळ जाऊन पाहिले, तर तो माणूस वाकून काहीतरी उचलत होता आणि समुद्रात सोडत होता. लेखकाने त्याला विचारले, ""तू हे काय करतो आहेस?'' ""किनाऱ्यावर आलेले हे स्टारफिश पुन्हा समुद्रात सोडतोय,'' त्या तरुणाने शांतपणे उत्तर दिले."
"पण का?''
"'सोपं आहे. थोड्याच वेळात सूर्य उगवेल. हळूहळू त्याची किरणं तप्त होतील. ते ऊन या माशांना सहन होणार नाही. मासे मरतील. म्हणून त्याआधीच मी त्यांना पुन्हा समुद्रात सोडतो आहे.''
"भल्या मित्रा, आपल्या देशात असे कित्येक किलोमीटर लांबीचे समुद्रकिनारे आहेत. रोज असे किती तरी स्टारफिश लाटांबरोबर वाळूवर पडत असतील. तू इथे काही स्टारफिश पुन्हा पाण्यात सोडून काय साध्य होणार आहे?'' बोलणं सुरू असतानाही त्या तरुणाचे हात थांबलेले नव्हते. लेखकाचा प्रश्‍न ऐकून त्यानं एक स्टारफिश उचलला आणि पाण्यात सोडला. तो म्हणाला, ""या एकासाठी तर फरक पडला ना! मला वाटतं, आपल्या सर्वांमध्ये एक शक्ती आहे. आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात निश्‍चितच फरक पडू शकतो. परमेश्‍वराने आपल्या सर्वांनाच ही देणगी दिली आहे. एकामुळे दुसऱ्याच्या, दुसऱ्यामुळे तिसऱ्याच्या आणि तिसऱ्यामुळे चौथ्याच्या आयुष्यात फरक पडू शकतो. आपण फक्त आपला "स्टारफिश' शोधायला हवा! त्याला निवडून हळुवारपणे पाण्यात सोडायला हवं. असं झालं तर हे जग नितांतसुंदर होईल.''

या गोष्टीचा लेखक माहीत नाही; परंतु तो मोठा द्रष्टा आहे, हे निश्‍चित. आपण बारकाईने पाहिले, तर असे कितीतरी स्टारफिश आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांना उचलणे आणि प्रवाहात सोडणे, एवढे लहानसे काम आहे. त्याला पैसा लागतो का? नक्कीच नाही. परवाच एका आजोबांची भेट झाली. निवृत्तीनंतर काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. त्यांनी आपल्या परीने त्यावर उपाय शोधला. जवळच्याच एका रुग्णालयात ते रोज जाऊ लागले. रुग्णांना धीर देणे, गरज असल्यास त्यांच्याजवळ बसणे, बरोबर आलेल्या नातेवाइकांना पाय मोकळे करण्यासाठी उसंत देणे, एखादा रुग्ण दगावल्यास पुढच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणे, अशी कामे ते उत्साहाने करू लागले. ते म्हणाले, "त्या रुग्णांवर उपचार करण्याएवढे पैसे माझ्याकडे नाहीत, पण त्यांना द्यायला वेळ आहे. मी तोच देतो.

''व.पुं.ची एक कथा आहे. "केव्हाही बोलवा' या संस्थेचे वर्णन त्यात आहे. सात जणांचा गट लोकांच्या गरजेच्या वेळी धावून जातो. रुग्णालयात थांबणे, गर्दीच्या वेळेत गरजूंसाठी रेल्वेमध्ये जागा धरून ठेवणे, अशी कामे हा गट करत असतो. ही कथा काल्पनिक असली, तरी त्यामागची स्फूर्ती, कल्पना मात्र काल्पनिक नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात. फक्त पैसा देऊन काही साध्य होते, असे नाही. वेळ देणेही तेवढेच महत्त्वाचे असते.

आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून फक्त एक तास आपल्या "स्टारफिश'साठी द्यायचे ठरवले तर? हे अशक्‍य आहे? नक्कीच नाही. थोडा विचार आणि थोडा वेळ, एवढेच हवे आहे. "आठवड्यातून फक्त एक तास' हे सूत्र पुरेसे आहे.

बिन पैशाचा दिवस

Posted by Abhijit at 10:45 PM

Wednesday, June 4, 2008

ही गोष्ट परवाची आहे. सकाळी ऑफिसला आल्यानंतर लक्षात आलं आपण पाकीट घरीच विसरलोय आणि खिशात फक्त दीड रुपया आहे. खिशात पैसेच नाहीत, ही भावना अशी शब्दात सांगण्याजोगी नाही. काहीतरी विचित्र वाटत होतं खरं! नशिबानं लायसन्स वरच्या खिशात होतं. म्हणजे घरी परतताना पोलिसानं पकडलं तरी प्रश्‍न नव्हता. पण आता दिवसभर पैसे नसताना वावरायचं म्हणजे काहीतरी विचित्रच वाटत होतं. आता करायचं काय, असा प्रश्‍न उभा राहिला. आज दुपारी कॅन्टिनमध्ये फक्त डबाच खायचा, इतर काहीही घ्यायचं नाही... असं स्वत:लाच बजवावं लागलं. इतर दिवशी चार-पाच वेळा होणाऱ्या चहालाही काट मारावी लागणार होती... (तसं कॅन्टिनमध्ये "खात्या'ची सोय आहे; पण मला ती आवडत नाही.) सकाळी डोकंच भिरभिरलं. ए.टी.एम. कार्ड असतं तर जाऊन पैसे काढून तरी आणता आले असते. कार्डही पाकिटातच असल्यामुळं तीही सोय नव्हती. छे! वैताग आला. सकाळ गेली, दुपार आली. जेवण्यासाठी कॅन्टिनला गेलो. गरम भजी होती; पण मन आवरलं.

दुपारही ढकलली. आता संध्याकाळ झाली. घरी जाण्याची वेळ झाली. मग मात्र मी घायकुतीला आलो. जाताना गाडी पंक्‍चर झाली तर? बिघडली तर? अचानक पेट्रोल संपलं तर? वेगवेगळे प्रश्‍न समोर उभे ठाकले. हो, ना करता करता ऑफिसमध्ये पाकीट विसरल्याची गोष्ट सांगितली. वैभवीनं "ठेवा' असं सांगून 100 रुपये दिले.

घरी गेल्यावर सगळ्यांना पाकिटाचा किस्सा सांगितला. त्यांनी माझ्या "विसरभोळेपणा'ची यथेच्छ टिंगल उडवली. रात्री सगळा हिशोब केला आणि लक्षात आलं, आज आपल्याला एकही पैसा लागलाच नाही! पैसे नसल्यामुळे मनात जे काही होत होतं, ते सोडलं तर इतर काहीही प्रॉब्लेम आलाच नाही! माझा बिन पैशाचा दिवस नेहमीसारखाच गेला की...

कॉलेजमध्ये असताना "कायमचा महिनाअखेर' असायचा. ते दिवस आठवले. अर्थात तेव्हाची गोष्ट वेगळी होती. "पैसा असणं' म्हणजे काय, हेच माहीत नव्हतं. आता ते समजलंय ना...

पेट्रोल वाढले... आता काय?

Posted by Abhijit at 3:11 AM

पेट्रोल वाढले, तर काय... याविषयीची एक भन्नाट क्‍लिप मला एकाने परवा मेल केली. ती इथे टाकतोय... आता आपल्यालाही हाच मार्ग स्वीकारावा लागणार आहे...

मोबाईल, इंटरनेट, टीव्ही याशिवाय...

Posted by Abhijit at 11:53 PM

Tuesday, June 3, 2008

काल आम्ही चार-पाच मित्र गप्पा मारत बसलो होतो. एकानं विषय काढला, आपण मोबाईल आणि इंटरनेटशिवाय जगू शकू का? त्यावर हिरीरीनं चर्चा झाली. शक्‍यच नाही, असा एक सूर होता. दुसरा सूर होता, तीन-चार वर्षांपूर्वी आपण कुठे वापरत होतो मोबाईल? तेव्हा इंटरनेटचा एवढा प्रभाव कुठे होता? तेव्हा नाही आनंदानं जगलो? आताच काय झालंय?

दोन्ही मतं आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. संपर्कासाठीचं सोपं माध्यम म्हणून इंटरनेट आणि मोबाईलकडे पाहायला हवं. टीव्ही हा एक स्वतंत्र विषय आहे. जाता जाता सांगतो. आजकाल, म्हणजे साधारणपणे महिन्याभरापासून मी संध्याकाळी टीव्ही पाहणं बंद केलंय. सकाळी एखादा तास पाहतो. तेही बातम्या आणि डिस्कव्हरी, ऍनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जिऑग्राफिकवर काही कार्यक्रम असेल तर तो. माझ्या आयुष्यात तरी काही फरक पडलेला नाही. आणि पडलाच असेल, तर तो चांगला. ऑफिसमधून घरी गेलं, की लेकीला घेऊन फिरायला जातो. आम्ही प्रचंड दंगा करतो. अंधार पडला, की गच्चीवर जाऊन खेळतो. नऊच्या सुमारास मी वाचत बसतो. संध्याकाळी सात ते दहा या तीन तासांचा इतका चांगला उपयोग टीव्ही पाहताना कधीच झाला नव्हता.असो, हा मुद्दा वेगळा आहे. तर मी बोलत होतो मोबाईल आणि इंटरनेटबाबत. या दोन्ही गोष्टी आपल्या खूप काही देणाऱ्या आहेत. आताही मला व्यक्त होण्यासाठी मी इंटरनेटचाच आधार घेतोय. पण सीमारेषा आखायलाच हवी ना! मला स्वत:वरूनच एक जाणवलं. आपण बऱ्याचदा वाहावत जातो. एक झालं की दुसरं असं करत जातो. मला काय करायचं आहे, हे एकदा डोक्‍यात स्पष्ट असलं, की सारेच मुद्दे संपतात...

पाऊस आला....

Posted by Abhijit at 6:01 AM

आपण सारे ज्याची मनापासून वाट पाहात होतो, तो पाऊस आज, मंगळवारी आला. आला कसला, जो काही थोडा वेळ होता, तो कोसळलाच! पावसाचं आगमन अगदी वाजत गाजत झालंय...आता कसं गार वाटतंय....

ऐकून तर पाहा...

Posted by Abhijit at 11:47 PM

Monday, June 2, 2008

हा एक नवा प्रयत्न. उत्तम कांबळे यांच्या आई समजून घेताना या पुस्तकातल्या काही प्रकरणांचं हे वाचन. ई-सकाळवर हे याआधी प्रकाशीत झालं आहे. सगळ्यात उजव्या हाताला ऐकून तर पाहा... या शीर्षकाखाली हे रेकॉर्डिंग आहे. एक क्‍लिक करा आणि ऐका...

थोडं समजून घ्यायला हवं ना?

Posted by Abhijit at 10:16 PM

माणसं समजून घेत नाहीत, याचा त्रास सगळ्यात जास्त असतो. आपण काहीतरी चांगल्यासाठी करायला जावं, आणि तेच त्यांच्या दृष्टीनं वाईट ठरावं, यासारखं दु:ख नाही. एका हेतूनं करावं आणि तोच वाईट ठरावा.... माणसं समजून का घेत नाहीत? काही गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. त्या समजून घ्यायच्या असतात, हेसुद्धा समजावून सांगावं लागावं? खरंच डोकं बधीर होऊन जातं.

आपल्या चुका होत नाहीत, असंही नाही. चुका तर होतातच. अर्थात त्यापेक्षा मोठी चूक होऊ नये, याची आपण काळजी घेतच असतो ना... एखादी गोष्ट आत्ता सोपी वाटते. हवीहवीशी वाटते; पण तेव्हाचा तो मोह भविष्यासाठी घातक ठरू शकणारा असतो, हे आपण पाहतो. तो टाळण्याचा प्रयत्न करतो, हे चूक असतं का?मला वाटतं भविष्याच्या विचाराऐवजी क्षणिक मोहाचा पगडा खूपच मोठा असतो. आजच्या काळात हा विचार किती चालेल ते महित नाही. आजचा दिवस जगून घ्या... हेही तेवढंच खरं आहे. पण जगून घ्या, म्हणजे काय करा, इथं खरा मुद्दा येतो. गेला क्षण गेला, येणारा क्षण माझा, ही संकल्पनाही उत्तम. पण येणाऱ्या क्षणात कसं वागायचं, हे आपण ठरवू शकतो ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेलेला क्षण येणाऱ्या क्षणावर आपली छाप उमटवूनच जात असतो, त्याचं काय? आपल्याकडे ना थोडी गडबड झालीये. एकतर अगदी पारंपरिक किंवा अति आधुनिक. अर्थात अजूनही अति आधुनिक नाही, पण त्याकडे धावायचा प्रयत्न सुरू आहे. तर मुद्दा हाच आहे. पारंपरिक आणि अति आधुनिक याच्या मधला मार्ग काय? दोन्हीतलं चांगलं घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही का? तसं झालं, तर कितीतरी प्रश्‍न सुटतील...

मी, बायको आणि भांडण...

Posted by Abhijit at 3:45 AM

काल आम्ही दोघं बोलत होतो. विषय भांडणांचा होता. बायको म्हणाली, पूर्वी तू माझ्याशी एवढा भांडत नव्हतास. तिनं चक्क पाच वर्षांचा हिशोबच काढला. पहिल्या वर्षी अजिबात भांडण झालं नाही. थोडेफार चिडवाचिडवीतून खटके उडाले असतील-नसतील, पण ते सारं मजेमजेनंच होतं. दुसऱ्या वर्षीही तशी भांडणं झाली नाहीत. तिसऱ्या वर्षी थोडीफार. आणि गेलं वर्षभर मी पाहते आहे, दर दोन-तीन दिवसांनी भांडतोस तू माझ्याशी... काय झालंय मलाच समजत नाही...

ऐकून मीच हादरलो. मी तर अजिबात भांडकुदळ नाही. मला रागही खूप कमी येतो, असं मी समजत होतो. कालच्या चर्चेनं थोडासा अंतर्मुख की काय म्हणतात, तो झालो. मग लक्षात आलं, आजकाल खरोखरच खटके जरा जास्तच उडायला लागले आहेत. तिला कळत नाही, आता हे बोलायलाच हवं का, तिला कुठे काय बोलावं हेच समजत नाही, असं काहीसं वाटत असतं मला. आणि दरवेळी खटका उडाल्यानंतर ती तेव्हा तशी का वागली, हे उशीरानं लक्षात येतं आणि स्वत:चीच चूक जाणवत राहते...तोंड उघडायच्या आधी या गोष्टी का जाणवत नाहीत, हेच समजत नाही. दुसरी बाजू का दिसत नाही? आधी आपण तोंड चालवून मोकळं व्हायचं... नंतर चूक लक्षात येते. तेव्हाही लगेच सॉरी वगैरे म्हणण्याची पद्धत नाहीच आपल्याकडे... कधी सुधारणार आहे मी... अक्षरश: हताश झालो मी. आता मात्र सुधारायचं ठरवलंय... आधी ऑफिसमधले, बाहेरचे ताण-तणाव, ओढाताण असे सगळे पर्याय आणि कारणं स्वत:लाच देऊन झालीत. पण ती सारी स्वत:च्याच मनाची समजूत आहे, हे लक्षात आलंय. आपलं वागणं चुकतंय, आपणच सुधारायला हवं, हेच खरं...

तो सुबहाका आलम क्‍या होगा...!

Posted by Abhijit at 4:57 AM

Saturday, May 31, 2008

त्या दिवशी मला समजलं... प्रत्येकाची वेळ असते, प्रत्येकाचा मूड असतो... आपण या गोष्टी लक्षात न घेता लेबल चिकटवून मोकळे होतो. हा घाट अनुभवावासा मला कधीच वाटला नव्हता, आता पुन्हा त्याच रस्त्यानं जायला निश्‍चित आवडेल.

मध्ये एकदा सहजच बेळगावला जाणं झालं. तसा नेहमी मी तिळारी घाटातून जातो, वेळेची बचत हेच कारण असतं त्यामागं. पण त्यावेळी पोहोचायची फारशी घाई नव्हती म्हणून अंबोली घाटातून जायचं ठरलं. ठरलं म्हणजे मी आणि माझा मित्र निघालो होतो बाईकवरून. नेहमी तिळारीमार्गे जात असलो तरी माझा आवडता घाट अंबोलीच, कायम स्वप्नवत वाटणारा!

बरेच रस्ते आणि घाट आपण नेहमी जातो म्हणून ओळखीचे असतात. त्यांची नेहमीची ओळख ठरलेली असते. अंबोलीचं तसं नाही. तो घाट आपल्याला दरवेळी वेगळा दिसतो, भासतो आणि जाणवतो. त्या दिवशी तर घाटात फारसं कोणी नव्हतंही. आम्ही अंबोलीला पोहोचेपर्यंत फारतर पाचसात वाहनं गेली असतील. घाटाच्या मध्यावर आल्यावर आमच्यावर पावसानंही कृपा केली. आधीच हा घाट थंडगार. मी त्याला एसी घाट म्हणतो. त्यात पावसाची हलकी सर पडून गेल्यावर तर विचारायलाच नको! खरोखरच रोमॅंटिक माहोल होता तो. अशावेळी सोबतीला मित्र नको, बायको हवी असं वाटत होतं खरं! पण काय करणार काही गोष्टींना पर्याय नसतो.

छानसा घाट, पावसाचा शिडकावा, आजूबाजूची गर्द झाडी आणि माकडं हे सारंसारं अनुभवत आम्ही पुढे जात होतो. काही वाटा संपूच नयेत असं वाटतं त्यातलीच ही एक वाट. यथावकाश बेळगावला पोहोचलो. कामं आटोपली आणि परतीच्या प्रवासाला लागलो. खरंतर येतानाही आम्हाला आंबोलीमार्गेच यावंसं वाटत होतं. पण उशीरही झाला होता. म्हणून नाईलाजानं तिलारी घाटातून यायचं ठरवलं. मघाशीच सांगितलं तसं हा घाट मला फारसा आवडत नाही. एकतर तो अवघडही आहे आणि आजपर्यंत केवळ जवळचा रस्ता, अशीच त्याची माझ्या मनातली प्रतिमा आहे. त्या मार्गानं जाणाऱ्यांना बेळगावकडून येतानाचा सुरवातीचा रस्ता नक्कीच डोळ्यासमोर येईल. आधीच मातीचा रस्ता, त्यात पाऊस पडलेला, मग काही विचारायलाच नको! (आधीच मर्कट तशात...) कसंबसं आम्ही तेवढा तो दहा मिनिटांचा पॅच अर्ध्या तासात पार केला. त्यावेळी सारखीसारखी अंबोलीचीच आठवण येत होती. आता याच रस्त्यानं जायचं म्हटल्यावर पुढे निघालो. पुढं गेलं की तिथे तिळारी वीज घराची कर्मचारी वसाहत आहे. तिथनं मात्र या रस्त्याचा नूरच बदलला...!

हा सारा रस्ता संध्याकाळी सहा वाजता चक्क धुक्‍याची छानशी दुलई ओढून बसला होता. या धुक्‍यानं आम्हाला अगदी शेवटपर्यंत साथ केली. घाटाच्या पायथ्याशी दुकानं आहेत. तीसुद्धा धुक्‍यातच लपली होती. अशावेळी चहा घ्यायलाच हवा, आवश्‍यकच असतो तो. दाट धुक्‍यात चहा पिण्याचा आनंद काय होता ते सांगताही येत नाही आणि त्याची कशाशी तुलनाही करता येत नाही! पुढे तर या घाटानं माझ्यावर मोहिनीच घातली. तो "केवळ जवळचा' रस्ता इतका वेगळाही असू शकतो, हे काही काळ पटतच नव्हतं. माझा मित्र तिथनं नेहमी जाणारा. त्यानं एके ठिकाणी गाडी थांबवली. मला म्हटला हळूहळू पुढे जा, आणि मजा बघ... छानसं गवत पसरलेलं होतं. त्यावर पिवळी पिवळी फुलं फुललेली होती... अर्थात धुक्‍यानं साथ सोडलेली नव्हती. अगदी काही पावलं पुढं सरकलो असेल तर समोर अथांग दरी पसरलेली! निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण करतो, म्हणजे नक्की काय करतो ते तिथं अनुभवायला मिळालं. ते सौंदर्य अनुभवायला आकाशस्थित ढगही दरीत उतरले होते. हो... मी खाली वाकून ढगही पाहात होतो... आपल्याला आनंदही चढतो, त्याचीही धुंदी असते याची जाणीव पहिल्यांदा झाली.

पुढचा सगळा रस्ता असाच होता. आम्ही ढगातून जसजसा घाट उतरत होतो तसतसे मुके होत गेलो. न जाणो एखादा शब्द बोलायचो आणि ढग दूर जायचे, असंच वाटत राहिलं. काहीवेळा मुकं राहणंच जास्त आनंद देतं, नाही का? अर्थात निसर्गाची ही भव्य नजाकत आणि सौंदर्याचा अनुभव घेताना वेळ कमी पडत होता. मग बोलून वेळ घालवणार कोण? खरंच खूप छान अनुभव होता तो. आपण उगाचच एखाद्याला कानफाट्या म्हणत असतो...

मला त्या दिवशी समजलं, प्रत्येकाची वेळ असते, प्रत्येकाचा मूड असतो... आपण या गोष्टी लक्षात न घेता लेबल चिकटवून मोकळे होतो. हा घाट अनुभवावासा मला कधीच वाटला नव्हता, आता पुन्हा त्याच रस्त्यानं जायला निश्‍चित आवडेल. घाट संपला आणि आम्ही पुन्हा नेहमीच्या रस्त्याला लागलो. घाटात असताना काही बोलावंसं वाटत नव्हतं खरं, पण एक ओळ मात्र पुन्हा पुन्हा डोक्‍यात घोळत होती, "जब रात है ऐसी मतवाली, तो सुबहा का आलम क्‍या होगा!' आता पुन्हा मी त्याच रस्त्यानं जाणार आहे, पण "सुबहा का आलम' अनुभवायला...!